चास (पुणे) : खेड व शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान (ता. खेड) धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दहा दिवसांत काहीशी वाढ झाली असून, पाणीसाठ्याने अर्धशतक पूर्ण केले आहे, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा निम्म्याने कमी आहे. सद्यःस्थितीत धरणात 52.95 टक्के (4.2 टीएमसी) पाणीसाठा झाला असून, मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा 97.86 टक्के होता व धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू होता.
याबाबत धरणाचे सहायक अभियंता प्रेमचंद शिंदे व शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी माहिती दिली की, चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून (ता. 25) पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून 47 टक्क्यांवरच स्थिरावलेला धरणातील पाणीसाठा पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. 17 जुलैपासून खेडसह शिरूर तालुक्यासाठी कालव्याद्वारे खरीप हंगामासाठीचे पहिले आवर्तन सुरू असून, सुमारे 550 क्यूसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे.
चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील श्री क्षेत्र भीमाशंकर व पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस सुरू आहे. या परिसरातील ओढे नाले खळखळून वाहत आहेत. हे सर्व पाणी चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.