पुणे : दुकानांची वेळ वाढविण्यासाठी व्यावसायिकांचे घंटानाद आंदोलन
पुणे - दुकाने (Shop) सुरू ठेवण्यासाठीच्या वेळेत (Time) वाढ करावी, या मागणीकडे राज्य सरकारचे (State Government) लक्ष वेधण्यासाठी पुणे व्यापारी महासंघ आणि हॉटेल व्यावसायिकांतर्फे शहर आणि उपनगरांत झालेल्या घंटानाद आंदोलनाला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्या भावनांची दखल न घेतल्यास बुधवार (ता. ४) पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचा इशारा व्यापारी महासंघाने घेतला आहे. (Ghantanad Agitation Movement of Traders to Increase Shop Hours)
व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यास सध्या सायंकाळी चार वाजेपर्यंत परवानगी आहे. आगामी दिवस सणासुदीचे असल्यामुळे दुकाने सूर ठेवण्यास सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी द्यावी, विकेंड लॉकडाउनमध्ये शिथिलता द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, गोखले रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, गणेश पेठ, बोहरी आळी, शिवाजी रस्ता, टिंबर मार्केट, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, लष्कर परिसर, येरवडा आदी ठिकाणी व्यापाऱ्यांचे गट एकत्र आले आणि त्यांनी मंगळवारी दुपारी बारा ते सव्वा बाराच्या सुमारास घंटानाद आणि थाळी वाजवा आंदोलन केले.
व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला ‘जाणीव’ संघटनेनेही पाठिंबा दिला होता, अशी माहिती महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.
हॉटेल व्यावसायिकांचेही आंदोलन
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय दीड वर्षांपासून ठप्प आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशननेही व्यापारी महासंघाच्या आंदोलनात सहभाग घेतला. डेक्कन येथील गुडलक चौकात सरकारच्या विरोधात घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. समीर शेट्टी, राहुल रामनाथ, यशराज शेट्टी, अक्षत शेट्टी, जीवनात चावला, रोहन शेट्टी आदी व्यापारी या प्रसंगी उपस्थित होते.
युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग म्हणाले, ‘‘आम्ही करत असलेले घंटानाद व थाळीनाद आंदोलन हे राज्य सरकारला घोर झोपेतून जागे करण्यासाठी आहे. फूड हॉटेल्स, रेस्टॉरंट बार, परमीट रूम उद्योग दीड वर्षांपासून बंद आहे. हॉटेल सायंकाळी चार वाजता बंद करणे म्हणजे आमच्या उद्योगासाठी संपूर्ण शटडाउन आहे.’’
असोसिएशनचे खजिनदार समीर शेट्टी म्हणाले, ‘‘हॉटेल व्यवसाय दुपारी १२ ते ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजून ३० मिनिटांपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. तसेच, उत्पादन शुल्कातही सवलत मिळावी. आम्हाला वीज बिल, पाणी कर आणि मालमत्ता करात सवलत हवी आहे. गुजरात, केरळ, कर्नाटकसह इतर राज्यांनी ही सवलत यापूर्वीच दिली आहे.’’
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुण्यातील निर्बंधांचा फेरविचार करण्याची गरज आहे. कारण, शहर आणि ग्रामीण यांची एकत्र सांगड घालण्यापेक्षा यापुढे शहर आणि ग्रामीण असे स्वतंत्र युनिट करून निर्णय घ्यावेत, असे प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी सुचविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पुणेकरांच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे पुणे शहरातील रुग्ण कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनाही यापूर्वी निवेदने दिली आहेत. परंतु, व्यापाऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकारने आमच्या भावनांची दखल घेतली नाही तर, बुधवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही दुकाने उघडी ठेवणार आहोत. पोलिसांनी जर कारवाई केली तर व्यापारी महासंघ व्यावसायिकाच्या पाठीमागे असेल.
- ॲड. फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.