मुली कायम असुरक्षितच

मुली कायम असुरक्षितच

पिंपरी -  कासारसाई येथील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी येथील एका बालिकेचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही जवळचे नातेवाईक, परिचित व्यक्‍तींकडून लहान मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घरात व घराबाहेरही मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

कसबे प्रकरणाची आठवण
सात वर्षांपूर्वी घराबाहेर खेळत असलेल्या चारवर्षीय दीपाली कसबे या बालिकेचे अज्ञाताने अपहरण केले. निगडी जकात नाक्‍याच्या मागील बाजूस लष्कराच्या हद्दीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. या गुन्ह्यातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. या घटनेनंतर अवघ्या दोनच महिन्यांनी कासारवाडी येथील एका बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिचा खून करून मृतदेह लोहमार्गावर टाकला. या घटनेतील आरोपी शोधण्यातही पोलिसांना यश आले नाही.

नातेवाइकांकडूनच अत्याचार
सहा महिन्यांपूर्वी जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलीवर बलात्कार केला. अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही शहरात घडल्या आहेत. पिंपरी येथे पाच आणि सहावर्षीय लहान मुलींवर मामा आणि एका नातेवाइकाने लैंगिक अत्याचार केले होते. शाळेत शिकविलेल्या ‘बॅड आणि गुड टच’ यातून हा प्रकार उघडकीस आल्याने पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली येथे राहणाऱ्या चौदावर्षीय शाळकरी मुलीवर खासगी स्कूल व्हॅन चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

हिंजवडी येथे गेल्या आठवड्यात घरात घुसून संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग केला. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून न घेता तिला चार तास बसवून ठेवल्याचे उघडकीस आल्यानंतर एका अधिकाऱ्याची बदली नियंत्रण कक्षात केली. दोन वर्षांपूर्वी मोशी येथे छेडछाडीला कंटाळून एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली. या घटनेतही त्या मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले.

गेल्या काही दिवसांपासून लहान मुली व तरुणींवरील लैंगिक अत्याचारात वाढ झाली आहे. आजही शाळा, महाविद्यालयाबाहेर रोडरोमिओ उभे असतात. मात्र, जरब बसेल अशी कारवाई पोलिसांकडून होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. नात्यातील व्यक्‍तींकडूनच असे कृत्य होत असेल तर विश्‍वास ठेवायचा तरी कोणावर, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शाळकरी विद्यार्थिनींसाठी शाळा स्तरावर गुड टच आणि बॅड टच सांगण्यात येते. तसेच पोलिसकाका संकल्पनेतून प्रत्येक शाळेत नियमितपणे पोलिस विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहेत. शाळांमध्ये तक्रारपेटी ठेवण्यास सांगितले आहे. तसेच दामिनी ब्रिगेडची गस्तही शाळा परिसरात कायम असते.
- सतीश पाटील, सहायक आयुक्‍त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com