विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या : शरद पवार

sharad p.jpg
sharad p.jpg

पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील प्रत्येक घराशी, व्यक्तींशी संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

भोसरीतील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी मिळावी व आगामी निवडणुकीच्या दृष्टीने केलेल्या आखणीची माहिती देण्यासाठी हा मेळावा झाला. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते 

पवार म्हणाले, ""कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. ही देशाची निवडणूक होती. त्यामुळे लोकांनी देशासाठी सक्षम पर्याय म्हणून नरेंद्र मोदी हा चेहरा योग्य ठरविला. त्यामुळे परिचित नसलेले चेहरेसुद्धा निवडून आले. साहजिकच भारतीय जनता पक्ष विजयी झाला. विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र पालटेल. कारण लोक उमेदवार पाहून मत देतात. लोकांना आता बदल हवा आहे. तो आपण स्वीकारायला हवा. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात नवीन चेहरे द्या. त्यासाठी पक्ष नेत्यांनी आजपासून तयारीला लागावे. उमेदवार निवडताना कार्यकर्त्यांमधून नाव घ्या, सर्वसामान्य माणसाच्या उमेदवाराच्या नावांविषयी जाणून घ्या. मग नाव निश्‍चित करा. मात्र, उमेदवार नवाच असेल. कारण मतदारांमध्ये बदल झाला आहे. 

निवडणुकीला 98 दिवस राहिले आहेत. मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यामुळे आजपासून सर्वांनी आपल्याकडे दिलेल्या भागाची, वॉर्डाची जबाबदारी सांभाळा. प्रत्येक घराशी, घरातील प्रत्येकाशी संपर्क साधा. म्हणजे लोक म्हणणार नाहीत, निवडणुका आल्यात म्हणून हे आलेत. आता दुसरे काहीही काम करू नका. चिकाटी सोडू नका. मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचे ओझे बाळगू नका आणि त्यासाठी लोकांना जबाबदार धरू नका. कारण पराभव होण्यामागे आपलीच चूक असते. त्या चुका दुरुस्त करा.'' यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, महापालिका विरोधी पक्षनेता दत्ता साने, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना लोंढे, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते. 

"विलास लांडे इच्छुक नाहीत' 
प्रास्ताविकामध्ये माजी आमदार विलास लांडे यांनी मी निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली. हा धागा पकडून पवार म्हणाले, ""लोकसभा निवडणुकीच्या वेळी लांडे आणि कार्यकर्ते उमेदवारीसाठी माझ्याकडे दिल्लीत आले होते. परंतु, मागील निवडणूक लढवितानाच त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा आला होता. तो पुन्हा वाढू नये म्हणून त्यांना उमेदवारी दिली नाही. आता त्यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली. हा चांगला निर्णय आहे, असे म्हणताच जोरदार हशा उमटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com