मुलांच्या हाती मोबाइल नको; तबला-तंबोरा द्या!

मुलांच्या हाती मोबाइल नको; तबला-तंबोरा द्या!

पुणे - ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भवितव्य उज्ज्वलच आहे. कारण आताची तरुण पिढी खूप हुशार आहे. रियाजासाठी असंख्य साधनं आणि माध्यमं त्यांच्याकडं आहेत. फक्त तरुणाईचा हा प्रवाह शाळकरी वयातच शास्त्रीय संगीताकडे वळविला पाहिजे. त्यासाठी शाळेपासून संगीत आणि कला विषय सक्तीचा केला पाहिजे,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दिला जाणारा पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार पं. गिंडे यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी आपला चार दशकांचा सांगीतिक प्रवास, बासरीवरील संशोधन कार्य, नव्या पिढीतील संगीत यावर मनमोकळेपणे गप्पा मारल्या. गिंडे हे मूळचे बेळगावचे. संगीत साधना करताना त्यांनी वैदिक काळापासून चालत आलेल्या बासरीवर संशोधन केले. केशव वेणू या बासरीची निर्मिती त्यांनी केली. ॲक्रॅलिक नळीची बासरीदेखील त्यांनी बनविली आहे.

संगीत जिवंत राहायचे असेल, तर कानसेन तयार करावे लागतील. त्यासाठी शालेय जीवनापासून मुलांच्या जीवनात संगीत असायला हवे. यातूनच पुढे मोठे कलाकार घडत राहतील आणि देशाचं नावही तेच मोठं करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पारंपरिक शिक्षण महत्त्वाचं असलं, तरी जीवन समृद्ध करण्यासाठी संगीत वा कलेचा छंदही तेवढाच महत्त्वाचा आहे. सध्या जीवन धकाधकीचं आहे, जीवनशैली बदलते आहे; ताणतणाव आहेत. त्यातून मुक्त होण्यासाठीदेखील शास्त्रीय संगीत गरजेचं असतं, असे त्यांनी सांगितले.

लहान वयात मोबाइल वापराचा अतिरेक होऊ लागला आहे. त्यातून सामाजिक समस्या उभ्या राहात आहे. याबद्दल ते म्हणतात, ‘‘मोबाइल हा उपयुक्त असला, तरी तो धोकादेखील आहे. त्यामुळं मुलांच्या हाती हे खेळणं देण्यापेक्षा खेळणं म्हणून तबला, तंबोऱ्यासारखे एखादं वाद्य त्याच्या हाती द्या. त्याचं मनही रमेल, धोका टळेल आणि त्याच्या आयुष्याला दिशाही मिळेल.’’

भूपात मध्यम लावतोच कसा?
गप्पांच्या मैफलीत त्यांनी भीमसेन जोशी यांचे किस्सेही ऐकविले. गिंडे म्हणाले, ‘‘पंडितजींना सगळ्या कामांमध्ये अचूकता लागत असे. ते एकदा जंगली महाराज रस्त्यावरून गाडीतून जात होते. लाल सिग्नल सुरू होता. सर्व गाड्या थांबलेल्या होत्या. पण, एक ट्रकचालक ते धुडकावून पुढे गेला. पंडितजींना ते सहन झाले नाही. सिग्नल हिरवा झाल्यानंतर त्यांनी त्याचा पाठलाग केला. पण, तो काही थांबत नव्हता. त्यांनीदेखील पाठलाग सोडला नाही. शेवटी लोणावळ्यात त्यांनी त्याचा ट्रक अडवलाच. त्याला बाहेर खेचून ‘प्रसाद’ही दिला आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिला. हा किस्सा ते मजेशीरपणे सांगायचे. त्याने नियम मोडलाच कसा, असे सांगत ते म्हणायचे, ‘भूप रागात मध्यम तर वर्ज्य. मग हा भूपात मध्यम लावतोच कसा?’ म्हणजे नियम मोडला, तर त्यांना आवडत नसे.’’

गिंडे यांचा आज सन्मान
पं. केशव गिंडे यांना उद्या (ता.१०) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. पं. नाथ नेरलकर यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com