द्राक्ष उत्पादकांना फटका

द्राक्ष उत्पादकांना फटका

बारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे. मद्यार्क कंपन्यांचे घटलेले उत्पादन द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आले असून, बारामती व इंदापूर तालुक्‍यांतील या  हंगामात उत्पादित होणाऱ्या ६ हजार टन द्राक्षाला नव्याने बाजारपेठ शोधण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर अंतरापर्यंत दारू दुकाने नको असा आदेश दिल्याने त्याची अंमलबजावणी होताना हजारो दुकाने बंद झाली. परिणामी या दुकानांकडून होणारी दारूविक्री घटली.  त्याचा परिणाम मद्यार्क कंपन्यांवर झाला. त्यांनी उत्पादित केलेल्या लाखो लिटर दारूचा साठा तसाच शिल्लक राहिला. एकूणच दारूची मागणी त्या कालावधीत घटल्याने मद्यार्क कंपन्यांनी उत्पादित केलेले मद्यार्क टाक्‍यांमध्येच अडकून पडले. साहजिकच टाक्‍या पूर्ण भरल्याने नव्याने दारू तयार करण्यास मर्यादा आली. आता पुन्हा नियमात शिथिलता आल्याने तसेच महानगरपालिका, नगरपालिकांनी रस्ते आपल्या हद्दीत घेतल्याचे ठराव केल्यानंतर दारू दुकाने सुरू झाली आहेत, मात्र अजूनही काही कंपन्यांकडील शिल्लक मद्यार्क कायम आहे आणि बाजारपेठ पूर्ववत होण्यास काही काळ लागणार आहे. साहजिकच या स्थितीचा फटका मात्र सध्या द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. 

दरम्यान, बारामती तालुका फलोत्पादक संघ; तसेच द्राक्ष बागायतदार संघाच्या मदतीने या उर्वरित द्राक्षासाठी बाजारपेठ शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, या वर्षीच्या हंगामात अधिक गुणवत्तेची द्राक्षे उत्पादित करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com