'लोकसेवेसाठीच कृत्रिम बुद्धिमत्ता'

'लोकसेवेसाठीच कृत्रिम बुद्धिमत्ता'

पुणे - ‘‘पाश्‍चात्त्य देशांत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजे नोकऱ्या हिरावणारे तंत्रज्ञान समजले जाते. परंतु भारतातील परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. अब्जावधी लोकांची सेवा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येईल आणि नोकऱ्या निर्माण होतील,’’ असा विश्‍वास ‘आधार’चे जनक नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केला. 

पुण्यात आयोजित केलेल्या २३व्या एच. के. फिरोदिया पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. एच. के. फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे विश्‍वस्त अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. गोविंद स्वरूप उपस्थित होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल बंगळूर येथील ‘नॅशनल सेंटर फार बॉयोलॉजिकल सायन्स’चे संचालक प्राध्यापक सत्यजित मेयर आणि मुंबई येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’चे संचालक प्राध्यापक संदीप त्रिवेदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीलेकणी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.

नीलेकणी म्हणाले, ‘‘उद्योगामध्ये स्वयंचलित यंत्रे, रोबोंचा वापर होऊ लागला आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या कमी होणार आहेत. पण, भारतात पुरेशा शिक्षक व न्यायाधीशांचा अभाव आहे. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बहुसंख्येपर्यंत शिक्षण आणि न्यायदानाची प्रक्रिया सुकर करता येईल का, याचा विचार करावा लागेल. अन्य देश पैशांनी श्रीमंत असले, तरी आपण माहितीने समृद्ध आहोत. साडेतीन अब्ज मोबाईल फोन देशात वापरले जातात. अनेक स्रोतांमधून प्रचंड डाटा निर्माण होतो आहे. तो वापरण्याची यंत्रणा निर्माण झाली, तर त्यातूनही असंख्य रोजगार निर्माण होतील.’’ डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘एखाद्याने एक वाट शोधली की सारेच त्या दिशेने जातात; परंतु स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’’ 

आव्हाने पेलणे सोपे ः सत्यजित मेयर
सत्यजित मेयर यांनी, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संशोधनातील अनेक आव्हाने पेलणे सोपे झाल्याचे सांगितले. तसेच, जीवशास्त्राचा इतिहास, महत्त्व सांगताना या शास्त्राचे नवे आयाम आणि भविष्याचा वेधही त्यांनी घेतला. या क्षेत्रातील तरुणांना भरपूर संधी असल्याचेही ते म्हणाले.

आपला देश आता आधुनिक झाला आहे. परंतु पर्यावरण, प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य आणि अन्य या समस्या अजूनही आहेत, त्यासाठी नव्या पिढीने पुढे आले पाहिजे. विज्ञान क्षेत्रात येत्या काळात लक्षणीय प्रगती होणार आहे, त्यात योगदानाची मोठी संधी भारतीय संशोधकांना उपलब्ध होईल.
- संदीप त्रिवेदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com