अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान

टाकवे बुद्रुक : अवकाळी पाऊस पडल्याने भात खाचरातील कापलेले व शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता तरी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच सक्तीचा पीकविमा कापलेल्या विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. शासनाने मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

रविवारी सायंकाळी पाच नंतर पावसाने हजेरी लावली, सोमवारी पहाटे देखील पावसाच्या दोन सरी कोसळल्या, त्यामुळे शिवारात उभे असलेले पण कापणीला आलेल्या लोंब्याचे भात पडले. कापून ठेवल्यालेल्या भाताचे अधिक नुकसान झाले. पावसाचा जोर इतका होता की, ओढ्याच्या खाचरात पाणी शिरल्याने कापलेले भात वाहून गेल्याचे कोंडिवडेचे शेतकरी प्रकाश खरमारे यांनी सांगितले. 

वडेश्वरचे शेतकरी तुकाराम लष्करी म्हणाले, कापलेल्या भाताच्या लोंब्या पावसाने झडून गेल्या, वैरण हाताला येणार नाही. जेवढा खर्च झाला त्यापेक्षा कमी उत्पन्न मिळले. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा. वाहनगावचे शेतकरी प्रकाश पवार म्हणाले, या पावसाच्या तडाख्याने भाताचे नुकसान झाले, भाताची कापणी, झोडपणी ही पुढील कामे पूर्ण करायला मजुरांची संख्या वाढले. भात पिकाचे इतके नुकसान झाले की मजुरी द्यायला देखील परवडणार नाही. फळणेचे काळूराम मालपोटे म्हणाले, खरिपाचे पीक कर्ज घेताना शासनाने सक्तीचा पिक विमा घेतला, मागील महिन्यात गरजेला पाऊस पडला नाही, आणि आता गरज नसताना पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे.

विमा कंपन्यांनी विम्याची भरपाई द्यावी. कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा. पाऊस पडल्याने भाताच्या वावरात असे पाणी साचले होते, त्यातून भातपिक बाहेर काढून कसे वाळवायचे या विवंचनेत असल्याचे शंकर मराठे  यांनी सांगितले. एकीकडे भात कापणी सुरू असतानाच, दुसरीकडे भात झोडपून धान्याची रास लावली पण भाताची रास पाण्यात गेली आता वर्षभर खायचे काय असा प्रश्न मावळातील शेतकऱ्यांना पडला आहे. वर्षभर काबाडकष्ट केले, पण हे कष्ट व्यर्थ जाते की काय? आता पुढे काय या प्रश्नाने भात पिकवणारा हवालदिल झाला आहे. 

भातरोपे पेरण्यापूर्वी पासूनची मशागत ते भात कापणी झोडपून घरी आणण्यासाठी झालेले कष्ट, त्यावरील खर्च मजुरांची मजुरी पाहता भात पिक कधीच किफायतशीर ठरत नाही. यापूर्वी भात उत्पादक शेतकरी कसेबसे दुध धंदाच्या जोडीने प्रपंचाचा रहाटगाडा हाकीत राहीले. पण यंदा पावसाने बळीरामावर आस्मानी संकट धाडले आहे.
बाळासाहेब गायकवाड म्हणाले,काल पडलेल्या अवकाळी पावसाचा जोर इतका होता की, त्यात भात खाचरे पाण्याने भरून गेली. झोडपणी केलेले भात पावसाने भिजले. भात भिजून काळपट पडण्याची आणि भात भरडताना तांदूळ मोडण्याची शक्यता वाढली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com