पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी असतानाच बहुप्रतिक्षीत अशा पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. पुण्यात विसावलेला वैष्णवांच्या मेळा पावसाच्या आगमानाने सुखावला. काही ठिकाणी वारकऱ्यांची दुपारच्या विश्रांतीची गैरसोय झाली खरी, पण "पांडुरंग हरी' म्हणत त्यांनी पर्यायी व्यवस्थेचा आसरा घेतला.
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. वारकरी वारी निघेपर्यंत पावसाची वाट पाहत होता. पावसाअभावी शेतातील पिकांच्या पेरण्याही रखडल्या होत्या. अखेर ही सर्व भिस्त 'आपल्या पांडुरंगावर' सोडून राज्याच्या विविध भागातून वारीमध्ये सहभागी होण्यासाठी हे आळंदीत दाखल झाले. पंढरीच्या वाटेवर पुण्याच्या तिसऱ्या मुक्कामीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाकडे डोळे लागलेल्या या वैष्णवांच्या मेळावा सुखावला. त्यांनी आपापल्या गावी फोन करून तेथील पावसाची स्थिती जाणून घेतली.
या दरम्यान, पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या एक-दोन सरी दुपारपर्यंत पडून गेल्या होत्या. वारकऱ्यांचे दुपारचे जेवण झाल्यानंतर वामकुक्षीच्या वेळी पावसाच्या दमदार सरींनी सुरवात झाली. तास-दीड तासानंतरही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे विश्रांतीची पर्यायी जागेत वारकरी जात असल्याचे चित्र दिसत होते.
भाविकांची धांदल
ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या पादुकांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. मात्र, यातच पावसाने हजेरी लावल्याने भाविकांमध्ये धांदल उडाली. दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. तर, तरुणांनी आणि मध्यम वयीन स्त्री-पुरुषांनी पावसात भिजत पादुकांचे दर्शन घेणे पसंत केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.