हिंजवडीतील आयटी पार्कमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडला

Garbage
Garbage

पिंपरी - हिंजवडीतील आयटी कंपन्यांमधील कचरा उचलण्याच्या कामासाठी खासगी कंत्राटदारांवर अवलंबून राहावे लागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दोन वेळा निविदा काढूनही त्यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

आयटी पार्कमधील कंपन्यांत तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी फेज तीनमध्ये दोन हेक्‍टर जागेत प्रकल्प सुरू करण्यासाठी आतापर्यंत काढलेल्या निविदांमध्ये पात्र ठेकेदार न मिळाल्याने हे काम तीन वर्षांपासून अडकून पडले आहे. ‘एमआयडीसी’कडून पुन्हा त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यात पात्र ठेकेदार मिळाला तर हा प्रकल्प सुरू होण्यासाठी एक ते दीड वर्षाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आणखी काही काळ येथील कंपन्यांना कचरा उचलण्यासाठी खासगी कंत्राटदारांची मदत घ्यावी लागणार आहे.

आयटी पार्क सुरू झाल्यापासून कंपन्यांना कचऱ्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बहुतेक कंपन्यांनी आपल्याकडील कचरा उचलण्याचे काम खासगी कंत्राटदारांना दिले असून, त्यासाठी कंपन्या महिन्याला लाखो रुपये मोजत आहेत. आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रत्येक बैठकीमध्ये हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन, आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी कचऱ्याच्या प्रश्‍नावर मार्ग काढण्याची मागणी केली होती. मात्र, आजतागायत त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. आयटी पार्कमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्या संबंधित ग्रामपंचायतींकडे मालमत्ता कराचा भरणा करतात. त्यामुळे त्यांच्याकडून कचरा उचलण्याची सुविधा उपलब्ध न झाल्याने या कंपन्यांना स्वतंत्र मार्ग निवडावा लागला आहे.

असा आहे एमआयडीसीचा प्रकल्प
हिंजवडी आयटी पार्कमधील फेज तीनमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यासाठी एमआयडीसीने दोन हेक्‍टर जागा आरक्षित केली आहे. या ठिकाणी दहा टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यात कंपन्यांमधील कचऱ्याला प्राधान्य देण्याचे नियोजन केले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यातून बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. 

रस्त्यावरील कचऱ्याची समस्या गंभीर
आयटी पार्कमधील रस्त्यावरील कचऱ्याची समस्या गंभीर आहे. रविवारी केपीआयटी ते शिवाजी चौक या दरम्यान आठवडे बाजार भरतो. तो संपल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी यंत्रणा तयार केली आहे. त्या माध्यमातून रविवारी रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत हा परिसर स्वच्छ केला जातो. अनेक विदेशी नागरिक आयटी कंपन्यांमध्ये येत असतात. त्यांनी अनेकदा या भागातील कचऱ्याबाबत खंत व्यक्‍त केली होती. त्यामुळे असोसिएशनकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com