पंचवीस वर्षे एकही खड्डा पडणार नाही - चंद्रकांत पाटील

हिंजवडी - हिंजवडीतील विकास कामांचा प्रारंभ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट आणि मान्यवर उपस्थित होते.
हिंजवडी - हिंजवडीतील विकास कामांचा प्रारंभ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट आणि मान्यवर उपस्थित होते.

हिंजवडी - पाच, दहा नव्हे, तर पुढील २५ वर्षे एकही खड्डा पडणार नाही, असे दर्जेदार रस्ते हिंडवडीत तयार करू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील हिंजवडी, पिरंगुट औद्योगिक परिसरात १९६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ५८ किलोमीटर लांबीच्या तीन रस्त्यांचे भूमिपूजन आणि माण येथील ओढ्यावरील पुलाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी हिंजवडी येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात झालेल्या सभेत ते बोलत होते.  

या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, मुळशी तालुका भाजपचे अध्यक्ष अशोक साठे, कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहाणे, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नवनाथ पारखी, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे, शिल्पा ठोंबरे, महिलाध्यक्षा स्वप्नाली साखरे आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘‘आघाडी सरकारच्या काळात अपुऱ्या निधीमुळे दर्जेदार रस्ते होत नव्हते. त्यामुळे पाच ते सहा महिन्यांतच ते खराब व्हायचे. हे लक्षात घेऊन किमान १० ते १२ वर्षे रस्ते टिकावेत म्हणून हायब्रीड ॲन्युइटी (पीएन २६) अंतर्गत राज्यातील रस्त्यांची कामे करण्याचे पाऊल या सरकारने उचलले आहे. यामध्ये रस्ते करणाऱ्या ठेकेदाराला पहिल्या व दुसऱ्या वर्षी प्रत्येकी ३० टक्के रक्कम देण्यात येणार आहे. उरलेली ४० टक्के रक्कम पुढील १० वर्षांत टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. साहजिकच किमान १२ वर्षे या रस्त्यांची योग्य देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असणार आहे.’’

बापट म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेली रस्त्याची कामे आम्ही ‘सब का साथ, सब का विकास’ या उक्तीनुसार पूर्ण करीत आहोत. म्हाळुंगे ते घोटावडे, सूस ते लवळे व घोटावडे फाटा ते उर्से या तीन रस्त्यांमुळे हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळला त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मात्र, स्थानिक नागरिक व उद्योजकांना विश्वासात घेऊन बदल केले पाहिजेत.’’ ‘जनतेला विकास हवा आहे. विकासात राजकारण नाही’, असा टोलाही त्यांनी स्थानिक आमदार, खासदारांचे नाव न घेता लगावला. 
‘‘हिंजवडीत येणाऱ्या तीन लाख लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी सरकारने बजेटमध्ये आठ हजार कोटी रुपये एवढी भरभक्कम तरतूद केली आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भविष्यात रिंगरोडही करणार आहोत,’’ असेही बापट यांनी नमूद केले.

मुळशी धरणातील वाघवाडी पुलाचा प्रश्न मार्गी लावून, लवासा व कोळवण खोऱ्यातील रस्त्यांनाही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अशोक साठे यांनी प्रास्ताविकात केली. शरद जांभूळकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com