मेट्रोच्या कामाचे शंभर कोटी वाचणार 

मेट्रोच्या कामाचे शंभर कोटी वाचणार 

पुणे - मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी खोदकाम करणाऱ्या दोन टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) बाहेर काढण्यासाठी बुधवार पेठ (फडके हौदाजवळ) येथे पुरेशी जागा नाही. त्यामुळे दोन्ही मशिनने मंडईपर्यंत बोगदा निर्मिती केली जाणार आहे. परिणामी मेट्रोसाठी चार "टीबीएम'ची गरज पडणार नसून, तीन मशीनच्या सहाय्याने संपूर्ण बोगद्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चातही बचत होणार आहे. 

"टीबीएम'द्वारे केल्या जाणाऱ्या खोदाईच्या नियोजनात बदल करण्यात आला असून, सध्या कार्यान्वित झालेल्या दोन मशिनद्वारेच मंडईपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी दिली. मूळ आराखड्यानुसार या दोन्ही "टीबीएम'द्वारे बुधवार पेठ स्टेशनपर्यंतचे काम केले जाणार होते; पण तेथे ही मशिन भूगर्भातून बाहेर काढणे अडचणीचे ठरणार असल्याचे लक्षात आल्याने त्यात सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या दोन "टीबीएम'च्या माध्यमातून मंडई स्टेशनपर्यंतची अतिरिक्त खोदाई केली जाणार असल्याने स्वारगेट ते मंडई दरम्यानचे बोगद्याचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे तेथे दोन मशिनद्वारे काम करण्याऐवजी एकच मशीन वापरण्यात येणार आहे, असे दीक्षित म्हणाले. 

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानापासून स्वारगेटपर्यंत बोगद्याच्या निर्मितीसाठी सुरुवातीला महामेट्रोने चार "टीबीएम'द्वारे खोदाई करण्याचे नियोजन केले होते. त्यातील दोन "टीबीएम'द्वारे बोगद्यातील खोदकाम सुरू करण्यात आले आहे. स्वारगेटवरून अन्य दोन "टीबीएम'द्वारे काम करण्यात येणार होते. त्यातील एक "टीबीएम' पुढील काही दिवसांत पुण्यात दाखल होणार आहे. फडके हौद स्टेशनच्या जागेतून "टीबीएम' बाहेर काढण्याची तयारी महामेट्रोने केली होती. परंतु, स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे महामेट्रोला फडके हौद येथील स्टेशन दादोजी कोंडदेव शाळेत हलवावे लागले होते. या ठिकाणाहून दोन्ही "टीबीएम' बाहेर येऊ शकत नसल्याने बोगद्याची खोदाई मंडईपर्यंत वाढविण्यात आली आहे. मेट्रोच्या भुयारी मार्गाची दोन्ही टप्प्यांतील कामे टाटा-गुलेरमाक यांच्यातर्फे केली जात असल्याने त्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे महामेट्रोतर्फे सांगण्यात आले. 

शंभर कोटी रुपये वाचणार 

महामेट्रोच्या मूळ नियोजनानुसार चार "टीबीएम' मशीन वापरण्यात येणार होत्या. त्यात बदल करून तीनच "टीबीएम'द्वारे भुयारी मार्गातील संपूर्ण बोगद्याचे काम केले जाणार आहे. एका "टीबीएम'साठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च येत असल्याने त्यामध्ये बचत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च कमी होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com