पुणे - 'जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याने देशात आनंदाचे वातावरण असून, देशाची अखंडता व एकात्मतेची भावना दृढ झाली आहे,'' असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत "एक राष्ट्र, एक संविधान' या विषयावरील डॉक्टरांच्या जनजागरण सभेत डॉ. वर्धन बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रीय एकता अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.
डॉ. वर्धन म्हणाले, 'काश्मीरचा प्रश्न सहज सुटेल, असा विचार कोणाच्याही मनात येत नव्हता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कायद्याचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला. त्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार झाला नाही. देशवासीयांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले.''
या वेळी बापट यांनी मनोगत व्यक्त केले. मिसाळ यांनी स्वागत केले. पांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुकुमार सरदेशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
'डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारने कायद्याचा मसुदा तयार केला आहे. आवश्यक कार्यवाही करून येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात त्याला मान्यता मिळेल,'' असे आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले.
|