पुणे - सरकार आणि उद्योगांमध्ये संवाद असला पाहिजे त्यासाठी ‘द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (फिक्की) आणि ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) यांनी सरकारच्या धोरणनिश्चितीमध्ये बौद्धिक भांडवल रूपाने दुवा म्हणून काम करावे, असे मत फिक्कीचे अध्यक्ष व एडेलवाईसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रसेश शहा यांनी मंगळवारी व्यक्त केले.
सेनापती बापट रस्ता येथील आयसीसी टॉवर येथील एमसीसीआयएच्या ८४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी एमसीसीआयएचे मावळते महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, अध्यक्ष प्रमोद चौधरी आणि नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप भार्गव आदी उपस्थित होते. या वेळी हडपसर येथील एमसीसीआयए केंद्राचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शहा म्हणाले, ‘‘उद्योग सुरू ठेवण्यासाठी नेमक्या अडचणी काय आहेत, त्या कशा सोडविल्या जाव्यात यासाठी सरकार आणि उद्योगसमूहांमधील मध्यस्थी करणारा घटक म्हणून एमसीसीआयए आणि फिक्की यांनी पुढाकार घेत काम केले पाहिजे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे लहान उद्योगांपुढे आव्हाने असली तरी विकासाचा दर मात्र वेगाने वाढत आहे. सकल दरडोई उत्पन्न, विकासदर आणि देशातील तरुण मनुष्यबळ या तीन गोष्टींमुळे २०२५ मध्ये देशाची आर्थिक उलाढाल ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत जाऊ शकते. प्रत्येक उद्योगसमूहाने समभागधारकांशी संवाद साधत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे सर्व व्यवहार चोख ठेवावेत.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.