नगराध्यक्षपदातून कामाची पावती

Vaijyanta-Umaragekar
Vaijyanta-Umaragekar

मराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे प्रेम आणि समाजबांधवांनी दाखविलेल्या विश्‍वासास पात्र झाल्याने मोठे यश मिळाले.

संत गोरोबाकाकांच्या पुण्यभूमीत, उस्मानाबादच्या तेर भंडारवाडीत माझा जन्म. मराठवाड्यातीलच अशोकराव उमरगेकर यांच्याशी माझा विवाह झाला. सांप्रदायिक आवड असल्याने संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पुण्यभूमीत व्यवसायासाठी सासरे भगवानराव उमरगेकर आले. आम्हा पती-पत्नीलाही वारकरी संप्रदायाची आवड. आईवडिलांच्या व्यवसायाला हातभार लागावा म्हणून कुटुंबच आळंदीला आले. आळंदीकरांनी सन २००२ मध्ये प्रथम नगरसेवक केले. आता लोकमतातून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून देत आळंदीची प्रथम नागरिक होण्याचा मानही दिला. आळंदी पालिकेच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेला नगराध्यक्षाचा शिरपेच मला मिळाला. हीच आमच्या कामाची पावती. लोकांचे प्रेम आणि आजपर्यंत आम्ही निष्ठेने केलेली माउलींची सेवा आणि सरकारी योजना लोकांच्या दारापर्यंत पोचविण्याचे काम केले. त्याचीच पावती आम्हाला आळंदीकरांनी दिली. 

लग्नानंतर मी काही वर्षे गृहिणीच होते. सन २००२ मध्ये झालेल्या आळंदी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.

राजकारणाचा गंध नव्हता. लोकांसाठी झटून काम केले पाहिजे ही ऊर्मी पालिकेत गेल्यावर आली. सन २००७ ते नगराध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासात झोपडपट्टीतील नागरिकांसाठी सुविधा देण्यासाठी आघाडी घेतली. शहरात शौचालये, नळजोड, रस्ते तयार करण्यावर भर दिला. शहराला झळाळी देण्याचे काम केले. झोपडपट्टीतील अशिक्षित आणि बेरोजगार महिलांसाठी मेळावे आयोजित केले. महिलांना आर्थिक हातभार म्हणून वालाबाई बचत गटाद्वारे कापड दुकान मिळवून दिले. हातगाडी, भाजीचे दुकान तसेच बांगड्या विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावला. दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत आर्थिक विकास महिला महामंडळामार्फत संगणक शिक्षण, फॅशन डिझाइन आणि शिवण क्‍लासचे कोर्सेस आर्थिक मागास प्रवर्गातील सुमारे सहाशे जणांना लाभ दिला. पन्नास महिलांचा एक गट तयार करून प्रत्येक गटाला पन्नास हजार रुपयांचे मानधनही दिले. सुरक्षा विमा अंतर्गत सतराशे जणांचा विमा काढला.

पंतप्रधान गॅस योजनेअंतर्गत दोनशेहून अधिक महिलांना सिलिंडरचे वाटप केले. दिव्यांग व्यक्ती, अंधांना आर्थिक अनुदान सलग दोन वर्षे मिळवून दिले. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी राखून ठेवण्यासाठी संघर्ष केला. 

शहरातील आर्थिक मागास लोकांना पंधरा रुपयांत वीजमीटर देण्याची व्यवस्था करून दारिद्य्ररेषेखालील लोकांची घरे उजळविण्याचे काम केले. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून परित्यक्‍त्या आणि निराधार महिलांना शोधून त्यांचे अर्ज तयार करून लाभ मिळवून देण्यास आम्ही झटलो. सन २००७ मध्ये आदर्श मातांचा सन्मान केला. शिवाजीनगर येथील युनियन शिखर बॅंकेच्या माध्यमातून तीन लाख रुपयांचे कर्जवाटप महिलांना केले.

लोकांपर्यंत लाभ मिळावा याच उद्देशाने राजकारणाचा उपयोग केला. राजकीय आणि सामाजिक कार्यात पती अशोकराव उमरगेकर यांनी खंबीर साथ देत मला पुढे जाण्यासाठी पाठबळ दिले. सतत काही तरी नवीन करायचे हा माझ्या पतीचा शिरस्ता. राजकारण नाही तर फक्त समाजकारण कर. तू फक्त लोकांपर्यंत जा. त्यांच्या अडचणी समजावून घे, असा सल्ला ते मला नेहमी देत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून काम करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच सन २०१६ - १७ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने थेट जनतेतून नगराध्यक्ष झाले. याचा मला गर्व नाही तर सार्थ अभिमान आहे. मराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे प्रेम आणि समाजबांधवांनी दाखविलेला विश्‍वासास पात्र झाल्याने आम्हाला मोठे यश मिळाले. राजकारण करताना समाजकारण आणि लोकांबद्दल निष्ठा जागविणे हाच आमचा कुटुंबाचा मंत्र असल्याने आम्ही यशस्वी झालो. 

आळंदीकरांबरोबरच विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दिलेला आधार आणि पाठबळही तेवढेच मोलाचे आहे. जनसेवा ईश्‍वर सेवा मानूनच आम्ही उमरगेकर कुटुंब कार्यरत आहोत. याचे आम्हाला आत्मिक समाधान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com