पुणे : अतिवृष्टी, पूरस्थिती, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास, संबंधित फळ पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने फळबागांसाठी नवीन पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आपापल्या फळबागांचा विमा उतरविता येणार आहे. या विमा योजनेत द्राक्षे, डाळिंब, केळी, संत्रे, मोसंबी, आंबा व काजू या सात फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात सन 2011-12 पासून 2015-16 पर्यंत हवामानाधारित फळ पीक विमा योजना
राबविण्यात येत होती. त्यानंतर 2016 पासून या योजनेची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. या नव्या पुनर्रचनेत पिकांचे दोन समूहात (क्लस्टर) वर्गीकरण करण्यात आलेले आहे. या कलस्टरना अनुक्रमे मृग बहार आणि आंबिया बहार असे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यामध्ये मृग बहारासाठी पाच व आंबिया बहारासाठी चार समूह (क्लस्टर) तयार करण्यात आलेले असल्याचे राज्याच्या कृषी विभागातून सांगण्यात आले.
पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे या हवामानविषयक धोक्यापासून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी विमा संरक्षण देऊन, त्यांचे आर्थिक स्थैर्य कायम ठेवणे, हा या पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या योजनेसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रातील फळ पिके घेणारे सर्व शेतकरी पात्र आहेत. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या फळ पिकांसाठी पीक कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना ही पीक योजना सक्तीची आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक असणार आहे.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे सादर करण्यासाठी पीकनिहाय अंतिम वेगवेगळी आहे. त्यानुसार द्राक्षे, मोसंबी व केळी या फळपिकांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख सात नोव्हेंबर 2019, संत्रे, आंबा (कोकण) व काजू या फळपिकांसाठी 30 नोव्हेंबर 2019, आंबा कोकण विभाग वगळून इतर जिल्ह्यांसाठी 31 डिसेंबर 2019 आणि डाळिंबासाठी 14 जानेवारी 2020 अशी आहे.
पीकनिहाय विमा हप्ता (प्रति हेक्टरी)
- पिकाचे नाव --- विमा हप्ता
- द्राक्षे --- 20, 533 रुपये
- केळी --- 8,800 रुपये
- आंबा --- 8067 रुपये
- डाळिंब --- 8067 रुपये
- काजू --- 5667 रुपये
- संत्रे --- 5133 रुपये
- मोसंबी --- 5133 रुपये
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.