भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन

bhama askhed dam
bhama askhed dam

आंबेठाण (पुणे) : लेखी आश्वासन देऊनसुद्धा शासन आमची फसवणूक करीत असून, जलवाहिनी काम सुरू करून शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने आम्ही प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन आंदोलन करण्याऐवजी धरण परिसरात आजपासून जलसमाधी आंदोलन आणि १२ तारखेला योग्य निर्णय झाला नाही, तर त्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला.

जोपर्यंत भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत शासनाने ठरल्याप्रमाणे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम थांबवावे, यासाठी आंदोलकांनी आज आसखेड खुर्द (ता. खेड) येथे एकत्र येत जलवाहिनीचे काम थांबविण्याची मागणी केली. परंतु, कोरोनाची परिस्थिती आणि १२ तारखेला पुणे येथे होणार असलेली मिटिंग याचे कारण सांगत महसूल, पोलिस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आज आंदोलन थांबविण्याची भूमिका मांडली. त्यानुसार शेतकऱ्यांनी तात्पुरते आंदोलन थांबवून जलसमाधी आंदोलन सुरू केले.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, देविदास बांदल, गजानन कुडेकर, माजी सरपंच किसन नवले, धोंडिभाऊ कुडेकर, तुकाराम नवले, भागूजी राजगुरव, अण्णा देवाडे, पाटीलबुवा काळोखे, निवृत्ती नवले, स्वप्नील येवले, गणेश जाधव यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       

या वेळी शेतकऱ्यांनी फसवणूक होत असल्याबाबत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. 
याप्रसंगी शेतकऱ्यांनी डील केली, असं म्हणणाऱ्यानी स्वतः २०१४ मध्ये डील केली आहे, असा आरोप करत शासनाने फक्त आम्हाला दिलेले लेखी आश्वासन पाळावे, अशी मागणी केली. आजवर जेवढी निवेदने दिली, तेवढया देखील शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाले नसल्याची खंत या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
    

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना जमीन वाटप करावे, अपात्र शेतकऱ्यांना योग्य पॅकेज द्यावे, तसेच तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा, या प्रमुख मागण्यांसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात, न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे ताबे मिळावेत, वाढीव मोबदला मिळावा आणि बाधित गावांना नागरी सुविधा मिळाव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन करून या पूर्वी काम बंद पाडले होते.
    

सध्या येथे १० अधिकारी आणि १५० पोलिस कर्मचारी तैनात असून, करंजविहिरे, धामणे फाटा आणि आसखेड खुर्द या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
 या वेळी तहसीलदार सुचित्रा आमले, सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com