मुळशीतील या गावांमध्ये पाळणार जनता कर्फ्यू

corona
corona

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात कोरोनाने दोन दिवसांपूर्वीच शंभरी पार केली असून, द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. हा वाढता प्रसार लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील पूर्व भागातील पिरंगुट, नांदे, चांदे व सूस आदी गावांत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. 

नागरिकांनीच स्वेच्छेने आज रात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवार (ता. १६) या कालावधीसाठी हा कडक लॅाकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन व पोलिसांनीही त्याचे स्वागत केले आहे.  पिरंगुट येथील सरंपच चांगदेव पवळे म्हणाले की, ग्रामस्थ व व्यापारी महासंघाने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिरंगुट येथे ९ जुलै ते १४ जुलै या सहा दिवसांच्या कालावधीसाठी जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. नांदे येथील सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार ९ ते १६ जुलै दरम्यान आठ दिवस बंद पाळणार आहोत. सूस येथील सरपंच अपूर्वा निकाळजे यांनी सांगितले की, येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने त्याला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतःहून संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येथे ९ ते १५  जुलै या सात दिवसांच्या कालावधीसाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

या बंदच्या उपक्रमात परिसरातील औषधाची दुकाने व दवाखाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा आदींची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक कारणांशिवाय घराच्या बाहेर कुणीही येणार नाहीत. जी व्यक्ती विनाकारण घराबाहेर येईल , त्या व्यक्तीवर जनतेच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय येथील व्यापाऱ्यांनाही सूचना देऊन या कालावधीत घरपोच सेवाही बंद करण्याचे आवाहन केलेले आहे.  त्यामुळे या कालावधीत शेतीविषयक दुकाने, दवाखाने, औषधांची दुकानेही पूर्णवेळ उघडी राहणार आहेत. दूध विक्रीही सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेतच केली जाणार आहे. 

कंपनीतील कामगार, शासकीय अथवा खासगी सेवेत नोकरी करणारे नोकरदार यांना या बंदमधून सवलत देण्यात आलेली आहे. परिसरातील कंपन्या व शासकीय कार्यालये चालूच राहणार आहेत. पिरंगुटचे ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे, सूसचे ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. साकोरे व नांदे येथील ग्रामविकास अधिकारी आर. एम. भुजबळ यांनी या बंदचे स्वागत केले असून, या कालावधीत कुणाची गैरसोय होऊ न देण्याचे आवाहनही केले आहे. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांनी जनता कर्फ्यु हा जनतेने घेतलेला जनतेच्या हिताचा निर्णय असल्याचे सांगितले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com