जुन्नरला शिवसेना- राष्ट्रवादीत कलगीतुरा 

जुन्नरला शिवसेना- राष्ट्रवादीत कलगीतुरा 


नारायणगाव बाह्यवळण रस्ता कामाच्या श्रेयावरून आरोपप्रत्यारोप 


नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट रस्त्याच्या कामावरून शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामुळेच मंजुरी मिळाली होती. या कामाच्या मंजुरीशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा सबंध नाही. मात्र, या कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रकार त्यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे यांनी केला आहे. तर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नामुळेच हे काम सुरू झाले. मात्र, शिवसेना नेते रडीचा डाव खेळत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांनी केला.

पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा प्रारंभ मंगळवारी (ता. 23) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला होता. तांत्रिक अडचणी दूर करून बाह्यवळण रस्त्याचे बंद काम खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाले, अशी माहिती या वेळी बेनके यांच्यासह उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. या कार्यक्रमाला खंडागळे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, ठेकेदाराने काम सोडून दिल्यानंतर आढळराव पाटील यांच्या प्रयत्नामुळेच नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट रस्त्याच्या कामाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खास बाब म्हणून मंजुरी दिली होती. 23 नोव्हेंबर 2018 रोजी या कामाची निविदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने प्रसिद्ध केली होती. निविदा प्रक्रियेनुसार हे काम रोड वे सोल्यूशन कंपनीला देण्यात आले आहे. 8 मार्च 2019 रोजी या दोन्ही कामाचे 72 कोटी 88 लाख रुपयांचे इकरार पत्र देखील ठेकेदाराला देण्यात आले होते. 10 मार्च 2019 रोजी आढळराव पाटील यांच्या हस्ते नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे भूमिपूजन झाले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील आपसांतील अंतिम करार व ठेकेदाराकडून घ्यावयाची बॅंक गॅरंटी या तांत्रिक अडचणीमुळे काम सुरू झाले नव्हते. कामाच्या मंजुरीची प्रक्रिया अगोदरच पूर्ण झाल्यानंतर लोकसभा निवडणूक झाल्या. त्यानंतर हे काम सुरू झाले आहे. या कामाचे सर्व श्रेय आढळराव पाटील यांचेच आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्यांदा भूमिपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे.'' 
भूमिपूजन नाही, बंद कामाचा प्रारंभ 

याबाबत युवा नेते अतुल बेनके म्हणाले, ""नारायणगाव बाह्यवळण व खेड घाट रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर व करारनामा आदी तांत्रिक कामे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे झाल्याने काम सुरू झाले आहे. 28 जून 2019 रोजी खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. या वेळी मी व शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. डॉ. कोल्हे यांच्या प्रयत्नामुळेच हे काम सुरू झाले. मात्र, शिवसेना नेते रडीचा डाव खेळत आहेत. वाहतूक कोंडीमुळे जनता त्रस्त असताना मागील दीड वर्ष हे काम का सुरू केले नाही? या कामाचे भूमिपूजन नाही; तर बंद कामाचा प्रारंभ झाला आहे. हे काम आता बंद पाडण्याचा प्रयत्न करू नये.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com