पुणे - 'न्याय आपल्या दारी' या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने "फिरत्या लोक अदालत' हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत पुणे जिल्ह्यात 522 दावे निकाली काढण्यात आले. 3 ते 27 जून
या कालावधीत जिल्ह्यात 12 ठिकाणी फिरती लोकअदालत (मोबाईल व्हॅन) नेण्यात आली होती.
जिल्ह्यातून एकूण एक हजार 706 दावे फिरत्या लोक अदालतीसमोर ठेवण्यात आले होते. त्यातील 522 दाव्यांमधून एकूण 28 लाख 65 हजार 894 रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. दिवाणी स्वरूपाचे 25, फौजदारी 25 आणि दाखलपूर्व 472 दावे निकाली काढण्यात आले. पुणे विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात मध्यस्थ, लोक अदालत, कायदेविषयक माहिती, महिलांचे अधिकार, फौजदारी दावे, ज्येष्ठांचे अधिकार, मोटार अपघात कायदा, हिंदू वारसा कायदा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अशा विविध कायद्यांची माहिती देण्यात आली.
|