पुणे - राज्यातील शेतकरी संकटात असताना, कडकनाथ कोंबडी पालनाचा करार करणाऱ्या महारयत ऍग्रो कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना फसविले आहे. कंपनीने खरेदी केलेल्या कोंबड्यांचा मोबदला न देणे, खाद्य आणि डॉक्टरच्या खर्चासाठी शेतकऱ्याकडून पैसे उकळण्याचे धंदे केले आहेत. या सर्व प्रकरणाची सक्तवसुली संचालनालया (ईडी) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रहार जनशक्तीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
या वेळी शिरूर तालुक्यातील फसवणूक झालेले शेतकरी उपस्थित होते. कडकनाथ गैरव्यवहार प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. सुतार म्हणाले, 'महारयत'चे व्यवस्थापक सुधीर मोहिते आणि हनुमंत जगदाळे यांनी शेतकऱ्यांना कमी पैशात कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायाबाबत विविध आश्वासने दिली. वाढवलेली पिले कंपनीने घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला नाही. या प्रकणातील दोषींवर कडक कारवाई करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी.''
कोट
चार महिन्यांपूर्वी कंपनीकडून 300 पक्षी घेतले. त्यासाठी कंपनीने माझ्याकडून एक लाख रुपयांचे डिपॉझिट घेतले. त्यानंतर स्वखर्चाने मोठे केलेल्या कोंबड्यांपैकी 200 कोंबड्या कंपनीने ताब्यात घेतल्या. मात्र त्याचा कोणताही आर्थिक मोबदला दिला नाही. माझ्या परिचित आणखी सहा शेतकऱ्यांची कंपनीने फसवणूक केली आहे.
- अरुण वडगुले, शेतकरी, भीमा टाकळी, ता. शिरूर
|