Video : पुण्याच्या दक्षिणद्वारात "कचराकोंडी' 

Video : पुण्याच्या दक्षिणद्वारात "कचराकोंडी' 

मार्केट यार्ड -कात्रज चौकातून खेड शिवापूर-पुणे-सातारा महामार्गाकडे जाणारा कात्रज जुना घाट अक्षरशः कचरा घाट बनला आहे. या रस्त्यावर कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे घाटातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे कात्रज घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे. 

कात्रजघाट हे पुणे शहराचे दक्षिणद्वार आहे. मात्र, याठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे कचऱ्याने स्वागत होते. घाटातील प्रत्येक वळणावर रस्त्याच्या कडेला शहरातील नागरिक, या मार्गावरील हॉटेल्स, बांधकामे आणि इतर व्यावसायिकांकडून कचरा टाकला जातो. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, पोती, बॅगांमध्ये कचरा, एक्‍स्पायरी झालेली औषधे, सुया, इंजेक्‍शन सिरींज, गोळ्या, सलाईन बॉटल्स, पावडर, पट्ट्या, सिरप लिक्विडच्या बाटल्या, जुनी कपडे याप्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. शिवाय हा कचरा नष्ट करण्यासाठी परिसर पेटवून दिला जात आहे. परिणामी, आरोग्यास हानिकारक अशी दुर्गंधी आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पेटवून दिलेल्या कचऱ्यामुळे घाटातील हजारो झाडे जळाली आहेत. यातून निर्माण होणाऱ्या वायूमुळे वन्यजीव आणि वनस्पतींचे वन्यजीवन धोक्‍यात आले आहे. 

या राडारोड्यामुळे घाटातून वाहन चालविताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. राडारोड्यामुळे घाट रस्त्याचे चर बुजले आहेत. घाटातील या घाणीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे घाट रस्त्यावर राडारोडा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

कचरा उचलायचा कोणी ? 
कात्रज चौक ते सातारा महामार्गापर्यंतचा काही भाग हा महानगरपालिकेच्या तर काही भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. तसेच घाट रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्या परिसरातील वनविभागाअंतर्गत येते. त्यामुळे या परिसरातील राडारोडा आणि कचरा नेमका कोणी उचलायचा आणि यावर अंकुश कोणी ठेवायचा हा प्रश्न पडत आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा कचरा तसाच पडून आहे. यात दिवसेंदिवस भर पडत आहे. 

या उपाययोजनांची गरज 
- कचरा टाकणाऱ्यांवर त्वरित आळा बसविला पाहिजे. 
- हॉटेल चालक आणि बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी. 
- कचरा उचलण्यासाठी यंत्रणा हवी. 
- कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज. 

सध्याची स्थिती 
- घाटातील गटारे कायमच कचरा, राडारोड्याने भरलेली. 
- कचऱ्यामुळे सभोवतालचे वातावरणसुद्धा दूषित. 
- येथील वन्यजीवसंपत्तीला धोका. 
- पेटवून दिलेला कचरा अर्धवट जळाल्याने प्रदूषण. 
- अपघाताला आमंत्रण मिळत आहे. 

कचरा टाकणाऱ्यांनी कचरा या घाटात येऊन टाकू नये. हा कचरा कचराकुंडीत टाकला पाहिजे. घाटाचे सौंदर्य टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. निसर्गाचे संवर्धन करणे आणि त्याची निगा राखणे हे आरोग्यास फायदेशीर आहे. 
- सागर डोके, नागरिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com