कोथरूड - 'शहरातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने कमी पडत आहेत. क्रीडा कौशल्याच्या विकासासाठी मैदानांची गरज ओळखून महापालिकेच्या विकास आराखड्यात मैदाने आणि क्रीडांगणासाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. ती बदलू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,'' असे मत खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
कोथरूड येथील महेश बालभवनच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, उद्योगपती धनराज राठी, अतुल लाहोटी, महेश बालभवनच्या अध्यक्षा संगीता लाहोटी, सचिव गणेश मुंदडा, कार्याध्यक्ष रमेश धूत, सुशीला राठी, सुरेखा करवा, अंजली तापडिया, मनोज कास्ट आदी उपस्थित होते. या प्रसंगी महापौरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. बालभवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
टिळक म्हणाल्या, 'मुलांमधील कलागुणांच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांच्या मानसिक परिस्थितीकडे आपण दुर्लक्ष करत असल्याने काही मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.''
लाहोटी म्हणाल्या, 'बालभवन संस्थेने पालकांमध्ये चांगलाच विश्वास निर्माण केला आहे. संस्थेतील विद्यार्थीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.'' संगीत पिपंळीकर यांनी सूत्रसंचालन केले.
|