पाणीचोरांकडून अधिकाऱ्यांना महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा 

पाणीचोरांकडून अधिकाऱ्यांना महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा 

पुणे - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पुणेकरांचे अतोनात हाल होत असताना कालव्यातून मात्र विद्युत पंपाद्वारे बेकायदा पाणीउपसा करण्याच्या उद्योगाला पाटबंधारे खात्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे. पाणीचोरीचा उद्योग लपविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची साखळी पाण्यातून पाण्यासारखा पैसा कमवत असल्याचे उघड झाले आहे. 

या साखळीने पुण्याच्या हद्दीत महिन्याकाठी पंधरा लाख रुपयांचे गणित जुळविल्याचा हिशेब आहे. पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देणारे पाटबंधारे खातेच अशा प्रकारे व्यवहार करीत असल्याने लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

खडकवासला धरणाच्या उजवा मुठा कालव्यातून शेतीच्या नावाखाली पाण्याची चोरी होत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले होते. कालव्यातील पाणी उपसून ते खासगी टॅंकरमार्फत उपनगरातील रहिवासी, सोसायट्या आणि बांधकामांना अधिक भावाने  पुरविले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे पाणीचोरी होत नसल्याचे सांगितले; मात्र पाटबंधारे खात्याचे अधिकारी पाणी विकणाऱ्यांकडून महिनाकाठी ठराविक रक्कम घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकारी महिन्याला ५० हजार रुपयापर्यंत पैसे घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाई टाळण्यासाठीदेखील अधिकारी पैसे घेत असल्याचे एका पाणी विक्रेत्याने सांगितले. धायरी, वडगाव बुद्रुक, आंबेगाव, नऱ्हे, नांदेड या भागांमध्ये कालव्यातून पाण्याची चोरी होते. याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कालव्यामध्ये विद्युत पंप टाकून कालव्यातील पाणी शेजारील विहिरीमध्ये टाकले जात असून, तेथेच खासगी टॅंकर भरण्याची व्यवस्था केली आहे. आंबेगाव येथे सरकारी विहिरीच्या शेजारी सरकारी जागेत खासगी विहीर खोदली असून, त्या ठिकाणावरून खासगी टॅंकरमार्फत पाणी विकले जात आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात आली असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

कालव्यातील पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक आहेत. त्यांच्या कामावर नियंत्रण असते. बेकायदा पाणीउपसा होत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रघुनाथ व्यवहारे यांनी सांगितले.

पाण्यातून पैसा
कालव्यातून रोज सुमारे ९० लाख लिटर पाणीचोरी
शेकडो टॅंकर कार्यरत
वीजपंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा
विजेचीही चोरी
शंभर रुपयांमध्ये एक टॅंकर भरून मिळतो
नागरिकांना एक टॅंकर सातशे ते आठशे रुपयांना विकला जातो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com