पुणे - 'ब्राह्मण समाजाने राजकारणाला कमी समजण्याचे कारण नाही. ब्राह्मण देशाचे राजकारण बदलू शकतात. साडेतीन टक्के म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही एक असला तरीही लाखाला भारी आहे,'' असे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.
"ब्राह्मण जागृती सेवा संघ'तर्फे संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जानकर यांना अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते "समाजमित्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांना "समाजभूषण' पुरस्कार, अभिनेता स्वप्नील जोशी यांना "युवा गौरव' पुरस्कार, टेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे यांना "क्रीडा पुरस्कार' आणि भालचंद्र कुलकर्णी यांना "ब्राह्मण जागृती' पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी संघाचे संस्थापक अंकित काणे, उपाध्यक्ष रोहित जोशी, सह-सचिव रोहन जोशी उपस्थित होते.
जानकर म्हणाले, 'ब्राह्मण जात नसून एक व्यवस्था आहे. क्षेत्रात प्रावीण्य मिळविणे म्हणजे, त्यात तो ब्राह्मण बनतो, हीच या देशाची व्यवस्था आहे. ब्राह्मणांचा हात ज्यांना लागतो, ते या देशात "हिस्ट्रीमेकर' बनतात, फक्त "मिनिस्टर' बनत नाहीत. शिक्षण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत हा समाज आघाडीवर आहे. मात्र ब्राह्मण समाज राजकारणात येण्यासाठी तयार नसतो, हे आता बदलले पाहिजे.''
'ब्राह्मणांनी या देशात आरक्षण का मागू नये, हा माझा सवाल आहे. या समाजात गरिबी आहे. ते बोलत नाहीत, मग या समाजाची व्यथा कोणी मांडायची,'' असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
इनामदार म्हणाले, 'पोलिसांना खरी भीती राजकारण्यांची आहे. विधानसभेत एका पोलिसावर 25 आमदार हल्ले करत असतील, तर आम्ही काय करायचे?''
स्वप्नील जोशी म्हणाले, 'प्रत्येक कलाकारासाठी पुरस्कार हा पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे. त्यातून तो जर आपल्या माणसाकडून मिळाला, तर त्याची ओढ जास्त असते.''
|