'गरीबांचं दु:ख मातोश्रीवर बसून कळणार नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

CM UDDHAV THACKERAY
CM UDDHAV THACKERAY

पुणे - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. रविवारी दिवसभरात राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. तसंच या सरकारने आता लॉकडाऊन केलं तर एक रुपयासुद्धा पॅकेज ते देणार नाहीत असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात लोक कसं जगले हे तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी तुम्ही झोपडपट्टीत जा, तिथं लोकांना दिवसभर काम केल्याशिवाय रात्री चूल पेटत नाही. गरिबांचं दु:ख मातोश्रीवर बसून कळणार नाही असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन केलं तरी राज्य सरकार एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. आमचा या लॉकडाऊनला विरोध आहे असं चद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कोरोना हा संसर्गजन्य आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. लॉकडाऊनमुळे लोकांचे खूप हाल झाले, लोक त्यांच्या समस्या सांगतायत. या गरिब लोकांचे दु:ख मातोश्रीवर बसून कळणार नाही. लॉकडाऊन केलाच तर भाजप त्याला कडाडून विरोध करेल असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. लॉकडाऊनला व्यापारी, हातावर पोट असलेले लोक विरोध करतील. या लोकांसाठी तुम्ही पॅकेजची घोषणा करा. जर ते लोक दहा हजार मागत असतील तर तुम्ही पाच हजार द्या अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अहमदाबाद भेटीने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, अशा भेटी होतच असतात. राजकारण हे राजकाऱणाच्या जागी ठेवायला हवं. राजकाणाव्यतिरिक्तही भेटलं पाहिजे. महाराष्ट्रात अलिकडे अशा भेटींचं प्रमाण कमी झालंय. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट राजकीय असेलच असं नाही. एकीकडे अमित शहांनी भेट झाली असल्याचं म्हटलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र अशी भेट झालीच नाही हे सांगण्याची स्पर्धा सुरु आहे असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

अमित शहा  आणि शरद पवार भेटीनंतर राज्यात पुन्हा राजकीय समीकऱणं दिसणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप एकत्र येण्याचा निर्णय़ घेतला तर तुमची काय भूमिका असेल असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला सध्यातरी या भेटीबाबत काही माहिती नाही. आमच्या पक्षश्रेष्ठींनी जर राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका घेतली तर ती मान्य असेल. अमित शहा, जेपी नड्डा जे निर्णय घेतील त्याचं आम्ही पालन करू असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यांन सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com