विधानसभा 2019 : पुणे - 'महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आजघडीलाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. या वयातही त्यांचे व्यक्तिमत्त्व राज्यभरातील तरुणाईला भुरळ घालत असून, पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत,'' अशा शब्दांत "राष्ट्रवादी'चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचे कौतुक केले.
पुण्यात एका कार्यक्रमात आलेल्या आव्हाड यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील राजकारण, पक्षांतर, राष्ट्रवादीची स्थिती आणि पवार यांचा राज्यव्यापी दौरा आदी मुद्यांवर आव्हाड यांनी भूमिका मांडली.
ते म्हणाले, 'राजकारणात गेली 35 वर्षे पवार यांना पाहतो आहे. त्यांच्या भूमिका, निर्णय आणि धडाडीत कोणताही बदल नाही. 1990च्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे नेहमीच पवार यांच्यावर टीका करायचे. तशी टीका आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करीत आहेत. तरी पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर कोणताही परिणाम होत नाही. पंतप्रधान मोदी यांना पाकिस्तानचा कांदा, साखर चालते, त्यांचे नेते नवाज शरीफ यांना मिठ्या मारलेल्या चालतात. मात्र, भारतात येऊन ते पाकिस्तानवर टीका करतात. हे मोदी यांचे धोरण दुटप्पीपणाचे आहे. मोदी मंदीतून सावरण्याबाबत काहीच बोलत नाहीत. शेतमाल, त्यांच्या भावाबद्दल त्यांना काहीच देणे-घेणे नाही.'
|