महाराष्ट्राला विकास हवा असेल तर, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरात लवकर कोसळले पाहिजे. पण या राज्य सरकारला कधी घालवायचे, याचा निर्णय हा जनतेच्याच दरबारात होईल.
पुणे - महाराष्ट्राला (Maharashtra) विकास (Development) हवा असेल तर, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government)) लवकरात लवकर कोसळले (Collapse) पाहिजे. पण या राज्य सरकारला कधी घालवायचे, याचा निर्णय हा जनतेच्याच दरबारात होईल, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांनी शुक्रवारी (ता. ११) पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'विकासाभिमुख अर्थसंकल्प' या विषयावरील परिसंवादासाठी ते पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हे मत व्यक्त केले.
देशातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाचपैकी चार राज्यात एकहाती विजय मिळविला आहे. या निवडणुकीच्या निकालांचा महाराष्ट्रावर सध्या काय परिणाम होईल, हे आताच सांगू शकत नाही. परंतु जनतेच्या मनात भाजप आहे. राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपचा विजय होईल. उत्तरप्रदेश, गोवा या दोन राज्यात शिवसेनेला किती मते मिळाली, हे त्यांनी तपासून पाहिले पाहिजे. लोकशाहीत जनता सर्वात मोठी असते आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कधी घालवायचे, हे जनताच ठरवेल.’’
राज्यात दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. कराड म्हणाले, ‘‘युक्रेन व रशिया या दोन देशांमधील युद्धामुळे इंधनाची दरवाढ मोठ्या प्रमाणात होईल अशी चर्चा सध्या आहे. मात्र, केंद्र सरकार याबाबत लक्ष ठेवून आहे. भविष्यात जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने मंत्री गटाच्या बैठकीत जनतेच्या हितासाठीचा निर्णय घेतला जाईल.
'राज्य सरकारच्या केवळ पोकळ घोषणा"
सध्याचे राज्य सरकार केवळ विविध योजनांच्या पोकळ घोषणा करत आहे. मात्र प्रत्यक्षात त्या घोषणांची अंमलबजावणी करत नाही. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पैसे देण्याची घोषणा केली. पण दिसून येत नाही. दिवाळीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त कर कमी केला. पण महाराष्ट्र सरकारने इंधनावरील दर कमी केले नाहीत. पुरेशा शैक्षणिक, व्यापारी सवलती ही जनतेला दिल्या गेल्या नाहीत. विजेची देयके न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे, असा आरोपही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारवर केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.