महाविकास आघाडी सरकार स्थिर : दिलीप वळसे पाटील

महाविकास आघाडी सरकार स्थिर : दिलीप वळसे पाटील

मंचर  : ज्येष्ठ नेते शरद पवार व सोनिया गांधी यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार समाज हिताचे निर्णय राबवत आहे. एक वर्ष भक्कमपणे काम केले आहे. अजून चार वर्ष हे सरकार स्थिर राहणार आहे. सरकारला कुठलाही धोका नाही. पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक झाल्यानंतर सरकार कोसळेल. असा दिशाभूल करणारा प्रचार भाजप करत आहे. हा प्रचार खोडून काढण्याचे काम व त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे काम सोशल मिडियाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात सोमवारी (ता.२३) महाविकास आघाडीतर्फे आयोजित केलेल्या पदवीधर व शिक्षक  मेळाव्यात वळसे पाटील बोलत होते.

अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, बाळासाहेब बेंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, सुनील बाणखेले, वसंतराव भालेराव, विवेक वळसे पाटील, कॉंग्रेसचे नेते अल्लू इनामदार, प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब बाणखेले, सुभाष मोरमारे, सुभाष उमाप, सविता बगाटे, अरुणा थोरात, उपस्थित होते.

बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे मृत्यू  झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वळसे-पाटील म्हणाले, ''राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे विधान परिषदेत बहुमत टिकविण्यासाठी पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या उमेदवारांना निवडून द्यावे.

त्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत संपर्कावर भर देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. आंबेगाव, शिरूर विधानसभा मतदार संघात एकूण तीन हजार पदवीधर मतदार आहेत. मानसिंग पाचुंदकर यांनी ३९ गावांचे चांगले नियोजन केले आहे.

त्याप्रमाणेच आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क साधून महाविकास आघाडीचे विचार पटवून देण्याचे काम करावे. कोरोना सारखा आजार रोखण्यात राज्य सरकारने केलेल्या कामगिरीची दखल देशाने घेतली आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

गारटकर म्हणाले, "गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते बाद झाली होती. मतदान केंद्रात गेल्यानंतर निवडणूक अधिकारी देईल. त्या पेनाने उमेदवाराच्या पुढे पसंती क्रमांक टाकावा. योगायोगाने पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे अनुक्रमे उमेदवार लाड व आसगावकर यांची नावे मत पत्रिकेत प्रथमच  आहेत. त्यांच्यासमोर चौकटीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या पेनने मराठीत किंवा इंग्रजीत एक क्रमांक टाकावा. अनेकदा तेथे अंगठा, स्टार किंवा बरोबरची खूण केली जाते . त्यामुळे मते बाद होतात. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते महाविकास आघाडीला मिळतील. असा विश्वास आहे.'' 

यावेळी राजू इनामदार ,विष्णू हिंगे , देवदत्त निकम ,मानसिंग पाचुंदकर, प्रा नितीन जाधव यांची मनोगते झाली. अंकित जाधव यांनी आभार मानले. रमेश खिलारी यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार एक वर्षापूर्वी सरकार सत्तेवर आले. पण आंबेगाव तालुक्यात मात्र राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्ते प्रथमच या निवडणुकीनिमित्त एका व्यासपीठावर आल्याचे दृश्य पहावयास मिळाले. दिलीप वळसे-पाटील यांनीही शिवसेनेच्या उपस्थित नेत्यांचा उल्लेख आवर्जून केला.

विशेषतः शिवसेनेचे नेते राजाभाऊ बाणखेले यांचे तीन वेळा नाव घेतले. तर बाणखेले यांनीही वळसे पाटील यांचा आदराने उल्लेख केला. माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाड व आसगावकर यांनाच मतदान शिवसैनिक करणार आहेत. लाड हे सासरवाडी सांगली येथून आपले जवळचे नातेवाईक असल्याचे बाणखेले यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com