
'लग्न हा विषय अतिशय महत्वचा आहे. बदलत्या काळानूसार मुला-मुलींच्या अपेक्षा देखील बदलत चालल्या आहेत. पूर्वीसारखा लग्न हा विषय फक्त पालकांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
Manchar News : विवाहपुर्व समुपदेशन होणे गरजेचे - प्रतिभा तांबे
मंचर - 'लग्न हा विषय अतिशय महत्वचा आहे. बदलत्या काळानूसार मुला-मुलींच्या अपेक्षा देखील बदलत चालल्या आहेत. पूर्वीसारखा लग्न हा विषय फक्त पालकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता मुले व मुलीही खुप मोठ्या प्रमाणावर जागरूक झाले आहेत. यशस्वी विवाहासाठी समजूतदारपणा, सुसंवाद, तडजोड, सहकार्य याबाबत विवाहपुर्व समुपदेशन होणे गरजेचे आहे.' असे शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभा तांबे यांनी सांगितले.
मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर तांबे बोलत होत्या. यावेळी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी.कानडे, नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राणी शास्त्र प्रमुख डॉ.आर.जे जमादार, एन.बी आडमुठे, प्रा.टी.वाय रणदिवे उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या, 'पूर्वी लग्नासंदर्भातील निर्णय आईवडीलच घेत होते. आत्ता बदलत्या काळानुसार मुले-मुल विचारांची देवाण-घेवाण करतात. एकमेकांबद्दलाच्या अपेक्षा, आवडी-निवडी, भविष्याचे नियोजन यावर चर्चा केली जाते. शारीरिक, मानसिक आरोग्याची माहिती असणे, विवाहाचे वय, एकमेकांचे रक्तगट माहित असावेत काही आजार किंवा गर्भधारणेत येणारी क्लीष्टता याबाबत मनमोकळेपानाने चर्चा झाली पाहिजे.'
कानडे म्हणाले, 'प्रत्येक तरुण व तरुणीने विवाहापूर्वी आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, आपल्यात कोणकोणते गुण व दोष आहेत याची माहिती करुन घेणे गरजेचे आहे, जोडीदाराविषयीच्या वास्तवादी विचार असावेत, एकमेकांचे व्यक्तिमत्व जाणून घ्यावीत, यासाठी विवाह कोणत्या पद्धतीने झाला हे महत्त्वाचे नसून विवाहानंतर विवाह नोंदणी होणे गरजेचे आहे.'