मंचर - 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने पाच खेडी दत्तक घेऊन ती इस्राईलच्या मदतीने "स्मार्ट' करण्याचे काम सुरू आहे. शाश्वत पाणी, आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, एकरी उत्पादनात वाढ व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने गावे स्वयंपूर्ण केली जातील. त्याचे अनुकरण इतर गावांनी करावे, असा त्यामागील उद्देश आहे. गावांच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी होऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न "सकाळ' सातत्याने करत आहे,'' असे प्रतिपादन "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे रविवारी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित जनता विद्या मंदिराच्या आवारात सकाळ रिलीफ फंडातर्फे बांधल्या जाणाऱ्या माळीण वसतिगृहाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील होते. या वेळी "सकाळ रिलीफ फंडा'चे विश्वस्त डॉ. सतीश देसाई, डॉ. शैलेश गुजर, महेंद्र पिसाळ, तसेच विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, "मोरडे फूड्स'चे बाळासाहेब मोरडे, आंबेगावच्या सभापती उषा कानडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, कंत्राटदार हनुमंतराव भापकर आदी उपस्थित होते.
'सकाळ रिलीफ फंडाला चांगला प्रतिसाद मिळतो, याचे श्रेय समाजाचेच आहे,'' असे नमूद करून पवार म्हणाले, 'दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या भागात शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय उभे राहिले असून, त्याचा फायदा या भागाला झाला आहे.''
वळसे-पाटील म्हणाले, 'पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला (सीओईपी) वैभव प्राप्त करून देण्याचे काम पवार यांनी केले आहे. त्यांच्याच पुढाकारातून "सीओईपी'बरोबर अवसरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सामंजस्य करार झाला आहे. त्याचा फायदा अवसरीच्या महाविद्यालयाची गुणवत्ता वाढ व रोजगारनिर्मितीसाठी होणार आहे. मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पूरक असलेला अभ्यासक्रम तयार करण्यात विद्यापीठ व उद्योगांनी एकमेकांना सहकार्य करावे, या उद्देशाने "सकाळ'ने नुकतीच सिंगापूरला शिक्षण परिषद घेतली.'' माळीण वसतिगृहात आदिवासी मुलींना प्राधान्याने प्रवेश द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, विश्वस्त जयसिंग काळे यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम काळे यांनी आभार मानले.
|