मराठ्यांना ‘ओबीसी’तूनच आरक्षण हवे - शांताराम कुंजीर

वडगाव मावळ - मराठा संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपप्रसंगी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर.
वडगाव मावळ - मराठा संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपप्रसंगी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर.

वडगाव मावळ - ‘आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचे असून, मराठा व कुणबी एकच असल्याने ते ओबीसी प्रवर्गातच मिळायला हवे. आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर जाहीर न केल्यास २०१९ मध्ये या सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिला. 

मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मराठा संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप सोमवारी (ता. १९) येथील पंचायत समिती चौकात झाला. त्या वेळी कुंजीर बोलत होते. 

राज्य समन्वयक रघुनाथ चित्रे, जिल्हा समन्वयक रमेश हांडे, शंकर राक्षे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, प्राची दुधाणे, वामन बाजारे, अंकुश राक्षे, शंकर राक्षे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कुंजीर म्हणाले, ‘‘आरक्षणासह इतर मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर सरकारने काही मागण्यांचे जीआर काढले. परंतु, अंमलबजावणी मात्र केली नाही. त्यात अनेक त्रुटी ठेवल्या. त्याबाबत शेतकरी, तरुण, विद्यार्थी आदी घटकांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही संवाद यात्रा काढण्यात आली आहे. आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचे आहे व ते ओबीसी प्रवर्गातूनच मिळाले पाहिजे. मराठा समाज आत्तापर्यंत बहुजनांचा आधार राहिलेला आहे. आता त्याला गरज असल्याने इतरांनी आडवे न येता आधार देण्याची गरज आहे.’’

आरक्षणासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या सोमवारी (ता. २६) विधानभवनावर वाहनांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तो लोकशाही व शांततेच्या मार्गानेच असेल. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.  

हांडे म्हणाले, की आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत ४२ तरुणांनी बलिदान दिले आहे. सुमारे पंधरा हजार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही जणांकडून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, तर काही जण आरक्षणाची टिंगलटवाळी करत आहेत. यापुढे अशी टिंगलटवाळी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही आमचा हक्क मागतोय तो घेतल्याशिवाय राहणार नाही. 

या वेळी प्राची दुधाणे, रघुनाथ चित्रे, अंकुश राक्षे यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी प्रास्ताविक केले. अमोल ढोरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com