पुणे : ''मी स्वतःला नालंदा विद्यापीठाच्या विचारसरणीचा विद्यार्थी समजतो. म्हणूनच मी स्वतःकडे भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानाचा दूत म्हणून पाहतो; परंतु भारतीयांनाच त्यांच्या प्राचीन तत्त्वज्ञानाचा विसर पडला आहे. भविष्यातील पिढी घडविण्याकरिता भारताने प्राचीन व पारंपरिक तत्त्वज्ञान, आधुनिक शास्त्र आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला पाहिजे,'' असे मत तिबेटचे नेते आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी येथे व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित दुसऱ्या नॅशनल टीचर्स कॉंग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महापौर मुक्ता टिळक, डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. कस्तुरी चोप्रा, डॉ. अरुण निगवेकर, प्रा. एस. सी. सहस्रबुद्धे, डॉ. संजय धांडे आदींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लामा म्हणाले, ''आजच्या युगात मनुष्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मानसिकदृष्ट्या मनुष्याला प्रेमाची गरज आहे. त्यासाठी मानवता उपयुक्त असून, केवळ माझा देश असा विचार न करता वैश्विक सुख शोधले पाहिजे. पैसा, सत्ता आणि आधुनिक शिक्षण आवश्यकच आहे; त्याचबरोबर भावनिक समस्याही सोडवली गेली पाहिजे.''
भगवान गौतम बुद्ध हे सर्वोत्कृष्ट विचारवंत होते. महात्मा गांधी यांनी भारताला अहिंसा व सहिष्णुतेची शिकवण दिली. म्हणूनच आधुनिक भारताला पारंपरिक तत्त्वज्ञानाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. जगात शांतता कशी नांदेल, सामाजिक बदल कसा घडेल, याचे उत्तर भारतीय तत्त्वज्ञानात आहे. 21 वे शतक संवादाचे व्हावे, हिंसेचा नव्हे. मानवतेचा विचार जागतिक स्तरावरचा असावा.
- दलाई लामा, बौद्ध धर्मगुरू
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.