अंतरंगामुळे आपली खरी ओळख ठरते : नाना शिवले

sangavi
sangavi

नवी सांगवी (पुणे) : "वरवर दिसणाऱ्या रंगामुळे नाही तर अंतरंगामुळे आपली खरी ओळख ठरते. त्यामुळे आपण मनात आणलं तर आपल्या समस्या व व्यंगावर मात करु शकतो. म्हणून मनातला सुरक्षारक्षक जागा ठेवल्यास मनुष्य सर्व अडचणींवर सहजच मात करु शकतो." असे मत पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असा एकत्रित कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य राम गोन्टे, पर्यवेक्षक व जनता शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष गारगोटे, विश्वास जाधव, विठ्ठल चाकणे, प्रभावती खराडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रशालेच्या वतीने मागील पंधरा दिवसांपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यात अभिवाचन, कथाकथन, परिसंवाद, नाट्यवाचन, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व मराठी भाषेचे वैभव सांगत कविता, कथा, गोष्टी व दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग विद्यार्थ्यांना शिवले यांनी सांगितले. कवी अनिल दीक्षित यांचाही काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. 

शिवले म्हणाले, "मराठी भाषेने आपल्याला भरभरुन दिले आहे. जन्मापासून आपली सोबत करणारी आणि आपल्याला समृद्ध करणारी आपली मातृभाषा आहे. आपल्या भावनांना अर्थ देणारी, जिच्या ऋणातून कधीही उतराई होता येणार नाही इतकी मराठी भाषेची थोरवी आहे.'' 

पर्यवेक्षक मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक रामेश्वर होनखांबे यांनी केले. शारदा जगदाळे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com