नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल मनुष्यबळाचे आव्हान 

नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल मनुष्यबळाचे आव्हान 

पुणे : ''माणसाची कामे समजली जात होती, ती आता संगणक करू लागला आहे. भविष्यात मानवी मेंदूची गरज असलेली कामे यंत्रे काढून घेतील. त्यामुळे नवे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्याबरोबरच त्याची कौशल्य असणारे अनुकूल मनुष्यबळ निर्माण करण्याचे आव्हान भारतापुढे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, परीक्षा विभाग संचालक डॉ. अशोक चव्हाण आणि विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पीएचडी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. 

डॉ. माशेलकर म्हणाले, ''तंत्रज्ञानासंबंधी दी मार्टिक स्कूल अहवाल आहे. त्यात विविध कामांसाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने भारतातील 69 टक्के नोकऱ्या कमी होतील, असा इशारा दिला होता. नॅसकॉमसारख्या उद्योग जगातातील संघटनेने 2022 मधील नोकऱ्यांच्या स्थितीचा अंदाज घेताना चिंता वर्तविली आहे. त्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेने कामे हिरावून घेणारे तंत्रज्ञान आणि नोकऱ्या निर्माण करणारे तंत्रज्ञान ओळखण्याची गरज आहे.'' 

बॅंकिंग, वित्त आणि विमा क्षेत्रातील डाटा एंट्री ऑपरेटर, कॅशिअर, माहितीची तपासणी ही कामे कमी होऊ शकतात. परंतु सायबर सुरक्षा तज्ज्ञ, क्रेडिट ऍनालिस्ट, रोबो प्रोग्रामर यांसारख्या नोकऱ्या नव्याने निर्माण होऊ शकतात. पण प्रश्‍न हा आहे की त्यासाठी आपण तयार आहोत का? म्हणूनच शिक्षण व्यवस्थेला 'राइट टू एज्युकेशन'कडून 'राइट एज्युकेशन'कडे वळावे लागेल. नोकऱ्याविरहित प्रगती ही भारताला परवडणारी नाही. त्यामुळे भारताला या आव्हानावर मात करण्यासाठी नावीन्यपूर्ण धोरणांचा विचार करावा लागणार आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. 

यशासाठी 'माशेलकर मंत्र'! 
तंत्रज्ञानामुळे आव्हाने बदलत आहेत, त्यावर मात करून यशस्वी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना 'कानमंत्र' दिले. ते म्हणाले, ''कधीही अल्पसंतुष्ट राहू नका, तुमच्या अपेक्षा उत्तुंग ठेवा. यश हे तत्काळ कधीच मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावेच लागतात. संधीसाठी वाट पाहू नका, त्या निर्माण करा. तुम्ही सर्वकाही करू शकता, पण प्रत्येक गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे काय करायचे ते ठरवा आणि त्यावर केंद्रित व्हा. कुतूहल ही सर्जनशीलता आहे, त्यामुळे कायम कुतूहल वाटू द्या आणि आयुष्यभर सर्वोकृष्ट काम करण्याचा आणि होण्याचा ध्यास ठेवा.'' 

दीपाली मांजरेला राष्ट्रपती सुवर्णपदक 
शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासेतर उपक्रम यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी दीपाली मांजरे हिला राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. कमवा आणि शिका योजनेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या दीपाली सोनावणे आणि तंजिला शेख यांना नीलिमाताई पवार सुवर्णपदक देण्यात आले. तसेच विविध विषयांत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या 58 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com