लाखो अभियंते घडविले; पण कौशल्य विकासात मागेच : राजीव प्रताप रुडी

लाखो अभियंते घडविले; पण कौशल्य विकासात मागेच : राजीव प्रताप रुडी

पुणे : ''केवळ उच्च शिक्षण घेतलेले असणे, म्हणजेच काही 'मोठे असणे' नव्हे. कमी शिकलेले पण हाती उत्तम कौशल्य असणारे सुद्धा महत्त्वाचे असतात. आपण देशात अनेक वर्षे चार भिंतीतील उच्च शिक्षणासाठी आग्रही राहिलो, लाखोंनी अभियंते घडवत राहिलो. पण, कौशल्य विकासाबाबत मात्र आपण मागेच राहिलो. हे चित्र बदलायला हवे,'' असे मत केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केले. शिवाय, येत्या तीन वर्षात महाराष्ट्रात एक कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

कॉन्फीडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (क्रेडाई) पुणे विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या 'कुशल' या उपक्रमाअंतर्गत बांधकाम व्यवसायाशी संबंधित सुमारे 29 हजार कामगारांना गेल्या चार वर्षांत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी 'कुशलता दिवस' साजरा करण्यात आला. राज्याच्या कामगार आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कुशल चे अध्यक्ष जे पी श्रॉफ, शांतीलाल कटारिया, सतीश मगर आदी या वेळी उपस्थित होते. 

रुडी म्हणाले, '' कौशल्य विकासात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध कौशल्य पोचविण्यावर येत्या काळात भर देण्यात येणार आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.'' 

दरम्यान, राज्यातील दहा प्रमुख शहरांमध्ये कुशल उपक्रमाअंतर्गत बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारांना प्रशिक्षण देण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला. तसेच काही कुशल कामगारांचे सत्कारही करण्यात आले. 

कार्यक्रमात 'क्रेडाई'चेच टोचले कान ! 
'क्रेडाई'ने आयोजिलेल्या या कार्यक्रमात रुडींनी केंद्रीय अनुदानाच्या मुद्‌द्‌यावरून क्रेडाई संघटनेचेच कान टोचले. 'सरकारने उपलब्ध करून दिलेले केवळ 3 टक्के व्याजदराचे कर्ज घेण्याची क्रेडाईची क्षमता नाही काय ?' असा थेट प्रश्‍न उपस्थित करत रुडींनी उपस्थित क्रेडाई प्रतिनिधींना निरुत्तर केले. तुम्हांला सरकारी ग्रॅंट घेण्याची सवय झाली आहे. प्रसंगी ती सवय बदलण्याची तयारी ठेवा, असे रुडींनी सांगितले. शिवाय, कामगारांमध्ये कौशल्य विकास व्हावा, यासाठी क्रेडाईने संपूर्ण भारतात जाळे विणावे, असा सल्लाही त्यांनी आयोजकांना दिला. 

लालुंचे घोटाळे तब्बल दहा हजार कोटींचे ! 
'' लालू प्रसाद यादव यांनी केलेले घोटाळे तब्बल दहा हजार कोटींचे आहेत. ईडी, प्राप्तिकर विभाग व कायदा यासंदर्भात आपले काम करेलच. बिहारमधील आघाडी ही यापूर्वीच व्हायला हवी होती. या आघाडीमुळे आता नितीशकुमार हे लालूंच्या दबावातून मुक्त झाले आहेत,'' असेही रुडी या वेळी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com