मेहनत, चिकाटीने युवा पिढीने ध्येय गाठावे

मेहनत, चिकाटीने युवा पिढीने ध्येय गाठावे

पुणे : ''आयुष्य हे कोऱ्या कागदाप्रमाणे असते. त्यात आपणच भविष्याचे रंग भरत असतो आणि आपली स्वप्नांची दुनिया साकारत असतो. म्हणूनच त्यासाठीची मेहनत आणि चिकाटी घेऊन युवा पिढीने आयुष्याचे ध्येय गाठले पाहिजे. शेवटी 'कोशिश करनेवालों की कभी हार नही होती...' हेही खरेच आहे,'' अशा शब्दांत 'सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी युवा पिढीला भविष्यातील स्वप्नांशी एकनिष्ठ राहण्याचा कानमंत्र दिला. 

'सकाळ इंडिया फाउंडेशन'तर्फे दहावी, बारावी आणि पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना अरणकल्ले यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. त्या वेळी युवा पिढीशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. फाउंडेशनकडून या वर्षी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या 62 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. फाउंडेशनचे कार्यकारी सचिव डॉ. अ. श्री. कालगावकर उपस्थित होते. 

अरणकल्ले म्हणाले, ''युवा पिढीच्या डोळ्यांत आकांक्षांची चमक आणि आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द आहे. आजची युवा पिढी भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा चेहरा असून, या पिढीच्या माध्यमातून उद्याचा भारत घडणार आहे. बुद्धीने कुशाग्र असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व निभावणे ही अवघड गोष्ट आहे; पण अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनीही पाल्याप्रमाणे ज्ञानार्जन करण्याची वृत्ती ठेवावी. यश-अपयशातील आनंद वेगळाच असतो. तो आपल्याला नवी जिद्द आणि ऊर्मी देतो. त्यामुळे या काळात सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. आयुष्यातील ध्येयाचा पाठलाग सोडू नका. करिअरसाठीचे उद्दिष्ट ठरवा. त्या उद्दिष्टांशी एकनिष्ठ व्हा. प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहा. अशी वाटचाल करणारा व्यक्ती आयुष्यात अजिंक्‍य होतो. स्वतःमध्ये कणखर आणि भक्कम नेतृत्व निर्माण करा. यासोबतच आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपा. कोणत्याही ज्योतिषाला हात दाखवून आयुष्य घडत नाही. आव्हानांचा निडरपणे सामना केल्याने आयुष्य घडते. अनेकांच्या मदतीमुळे आपण आयुष्यात यशस्वी होतो. कुठेतरी त्यांची मदत आपल्या कामी येते. म्हणूनच आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांचे ऋण न विसरता त्याची परतफेड करावी. दातृत्व ठेवून समाजाला मदतीचा हात द्यावा.'' 

डॉ. कालगावकर म्हणाले, ''फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत दिली जाते. या वेळी पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. शैक्षणिक मेहनतीशिवाय विद्यार्थ्यांनी आरोग्यही जपले पाहिजे. फक्त अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळण्यापेक्षा विविध क्षेत्रांचा करिअर म्हणून विचार करायला हवा.'' 

गायत्री राजनकर यांनी सूत्रसंचालन केले आणि शलाका कवीश्‍वर यांनी आभार मानले. 

शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांचा आधार 
''गेल्या 60 वर्षांपासून सकाळ इंडिया फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती दिली जाते. या माध्यमातून अनेकांना मदत झाली आणि ते उच्चपदावर पोचू शकले. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी कौतुकाची थाप आहे आणि त्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठीचा एक आधार आहे. हीच जाणीव ठेवून फाउंडेशन काम करत आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे,'' असे मल्हार अरणकल्ले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com