वाहतूक पोलिसांकडून वसुलीच्या उद्दीष्टपूर्तीची घिसाडघाई

Traffic-Police
Traffic-Police

तळेगाव स्टेशन : सणावाराप्रमाणे यंदाही मार्च अखेरीपर्यंत ठरवून दिलेल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी वाहतूक पोलीसांकडून पावत्या देऊन चालू असलेली वसुली, दुचाकी चारचाकींसह अवजड वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांकडून भर रस्त्यावरच सर्रास वाहने अडवण्याचा नादात, रस्तेसुरक्षा धोक्यात आली आहे.

चालकांची बेशिस्ती लक्ष करत अथवा मुख्यालयाकडून आलेल्या आदेशान्वये वाहतूक पोलिसांकडून एरव्ही अधूनमधून राबविले जाणाऱ्या "वसुली" धोरणाने मार्च एन्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जरा जास्तच जोर धरला आहे. पुणे-मुंबई महामार्ग, तळेगाव-चाकण महामार्गासह ग्रामीण भागातही जिकडेतिकडे नाकाबंदी राबविली जात आहे.

सदर कारवाई आणि वाहन तपासणी मोहिमेत विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे आदी नेहमीच्याच सुमार आणि ढोबळ कारणांसाठी ठरलेली शंभर अथवा दोनशे रुपयांची पावती फाडून दिवसाचे आणि मार्च अखेरपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट गाठण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी पोलीस आणि वाहतूक सहाय्यकांच्या झुंडीच्या झुंडी ठराविक ठिकाणी उभ्या राहुन निर्धास्त चाललेल्या वाहनचालकांना अचानक हात करुन अथवा रस्त्यावरच आडवे येऊन वाहने थांबविण्याचा प्रयत्न करतात.

अचानक समोर आलेल्या पोलिसांमुळे वाहनचालकांची धांदल उडून ते गडबडताना दिसतात अथवा वाहनाचा वेग वाढवत वळसा घेऊन पोबारा करतात. या गोंधळात दुचाकीस्वाराचा तोल जाणे, दुचाकी घसरणे, अचानक थांबविलेल्या वाहनाला मागून येणारी वाहने धडकने असले अपघाती आणि धोकादायक प्रकार होताना नजरेस पडतात. परिणामी अपघातांची शक्यता बळावली आहे. याबरोबरच वसुलीचे उद्दिष्ट ठेऊन केवळ ठराविक नियम मोडल्याच्या नावाखालीच दंड वसुली करण्याच्या नादात, इतर महत्वाच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असूनही पोलिसांचे तिकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची ही मार्च एन्डची वसुली चालक, वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र चोहीकडे पाहावयास मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी नियमबाह्य वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करावी यात दुमत नाही मात्र,इतरांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी शिस्तप्रिय चालकांची मागणी आहे.

चाकण एमआयडीसीतल्या वसूलीला चालक वैतागले
तळेगाव-चाकण महामार्गावर चाकण एमआयडिसीतील एचपी चौकात मॅरियट हॉटेलजवळ रात्री नऊच्या पुढे भर रस्त्यात बॅरिकेड्स लावून, प्रत्येक वाहनचालकाला भररस्त्यावर थांबवून ट्रॅफिक वॉर्डनमार्फत होणाऱ्या बेकायदा विनापावती वसुलीमुळे, रहदारीला अडथळा होऊन वाहनांच्या रांगा लागतात. मुंबईकडे भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना यामुळे नाहक उशीर होतो. विशेष म्हणजे या रोजच्याच नाकाबंदी दरम्यान चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी वा पोलीस क्वचितच आणि तेही गाडीत बसलेले आढळतात. सततच्या नाकाबंदी आणि वसुलीसोबतच आता मार्च एंडमुळे मागणी वाढल्याने वाहतूकदार वैतागले असून, थेट पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.

मार्च अखेर उद्दिष्ट असला काही प्रकार तिकडे नाही.लोकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे म्हणून आम्ही वारंवार आणि नियमीतपणे मोहिमा राबवत असतो.जीवघेणे अपघात कमी करुन अमूल्य जीव वाचवण्याकामी याचा निश्चितच उपयोग होतो.मानवी जीव वाचवणे हेच आमचे उद्दिष्ट आणि ध्येय आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक  सुवेझ हक यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com