झगडताना गवसलेल्या औषधानं बदललं आयुष्य!

झगडताना गवसलेल्या औषधानं बदललं आयुष्य!

पुणे - ‘संघर्ष केल्याशिवाय नाही पुढे जाता येत. मला जमत नाही, म्हणून बसून नाही राहता येत... !’ आठ दशकांच्या आयुष्याचं जणू सूत्रच मीनाक्षी नार्वेकर-दामोदरन सांगत होत्या. खाचखळग्यांचा, अडथळ्यांचा प्रवास जिद्दीने पार केलेल्या औषधनिर्मात्या, महिला उद्योजक मीनाक्षीताई वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही उत्साहाने सहा-सहा तास ‘सीमोल’च्या निर्मितीचं - औषध निर्मितीचं काम करतात अन जगणं सावरणाऱ्या ‘सीमोल’चे मोल जपतात.

मुलांना शिक्षण देण्यासाठी-जगण्यासाठी सुरू केलेले काम आता त्या आनंदासाठी, आरोग्यदायी समाजासाठी करतात. मीनाक्षीताईंनी गेल्या चाळीस वर्षांची वाटचाल संयतपणे सांगितली. त्या मूळच्या वसईच्या. लहानपणापासून आयुर्वेदिक औषधं बनवताना पाहत होत्या. त्याचा उपयोगच त्यांना ‘सीमोल’ हे दातदुखी, हिरड्यांची सूज, रक्त-पू येणे यावर गुणकारी ठरणारे औषध बनवताना झाला. त्याची सुरवात योगायोगाने झाली. मीनाक्षीताईंची मुलगी सीमा लहान होती. तिच्या हिरड्या ठणकायच्या. डॉक्‍टरांच्या औषधांचा गुण येईना. मग घरगुती उपचार सुरू केले. पाच-सहा औषधं तयार केली. त्यातील एका औषधाचा गुण आला. त्याचे पाचशे नमुने डोंबिवलीत वाटले.

लोकांना आलेला अनुभव मीनाक्षीताईंचा उत्साह वाढवणारा होता. दंतरोग तज्ज्ञांनीही पसंतीची पावती दिली. याच काळात वैयक्तिक आयुष्यात मात्र तणाव होते. मीनाक्षीताईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. सासर-माहेरचा आधार संपलेला. पतीच्या विक्षिप्तपणामुळे मुलांचे बालपण करपून गेले. भांडणे आणि वळ उठेपर्यंत मार ठरलेला. शिवाय पैशांची मागणी असेच. या परिस्थितीत त्या रोजगाराचे मार्ग शोधत होत्या. दातदुखीच्या औषधाला मिळालेला प्रतिसाद पाहून रीतसर परवानगी घेऊन त्यांनी ‘सीमोल’ची निर्मिती सुरू केली. मुलांना उच्च शिक्षण देता यावं, या तळमळीने त्या स्वतःच औषध बनवत आणि विकतही! एव्हाना २५ वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. 

मीनाक्षीताईंचा दिवस मध्यरात्री तीन वाजता सुरू होई. रात्री बाराला संपे. उत्पादन-विक्री-वितरण सर्व आघाड्या सांभाळत. मुंबईतील एकूण एक औषधाचं दुकान त्यांना माहीत आहे. प्रत्येक दुकानात त्या स्वतः जाऊन ‘सीमोल’ देत. वीस-वीस किलोचं ओझं घेऊन मुंबईतील उपनगरे पालथी  घालत. नंतर पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशी मोठी शहरेही त्या फिरल्या. जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा किंमत माफक ठेवण्यावर भर दिला. मुलगी डॉक्‍टर आणि मुलगा इंजिनिअर. डोंबिवली सोडून त्या पुणेकर झाल्या. आता त्यांचा मुलगा स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांना मदत करतो.

‘स्वतःवरचा विश्‍वास कमी होऊ द्यायचा नाही. हिंमत सोडायची नाही. निसर्गाच्या जवळ जाल, त्याला जपाल, तर यश मिळेल. भक्तिमार्गाने-अध्यात्माने मला हेच सांगितले.
- मीनाक्षी नार्वेकर-दामोदरन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com