पाणीपुरवठ्याविषयी आज मुंबईत बैठक

पाणीपुरवठ्याविषयी आज मुंबईत बैठक

पुणे - शहराला दररोज ११५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात कालवा समितीच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी आज (सोमवारी) जलसंपदा मंत्र्यांसमावेत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत शहराचे नेतृत्व करणारे पुण्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ करून घेणार का, झालेली चूक सुधारणा का, जलसंपदा आणि महापालिका यांच्यात सुरू असलेला पोरखेळ थांबणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने धरणात पुरेशा पाणी साठा नाही. त्यामुळे शहराला दररोज ११५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत झाला होता. या बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात कालवा समितीच्या बैठकीत झालेला निर्णय आणि या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे दिलेले आश्‍वासन याचा अनुभव गेल्या दोन महिन्यांपासून पुणेकर घेत आहे. कालवा समितीच्या निर्णयाचा आदेश दाखवत जलसंपदा विभागाने दोन वेळा पाणीकपात करण्याचा प्रयत्न केला. ऐन वेळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात पाण्यावरून सुरू असलेला पोरखेळ कधी थांबणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर निर्णय घेण्यासाठी उद्या (सोमवारी) जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री, कालवा समितीचे सदस्य असलेले पुणे व जिल्ह्यातील आमदार, महापौर आणि महापालिका आयुक्त उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये कालवा समितीच्या निर्णयाचा फेरविचार करून शहराला दररोज १३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील मागणी महापालिकेकडून करण्यात  येणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com