उजनीतून सोलापूरला प्यायला सोडण्यात येणारे भिमेचे पाणी बंद करण्याची मागणी

indapur
indapur

इंदापूर (पुणे) : उजनी धरणातून सोलापूर शहरास भिमा नदीतून पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभियंता खलील अंसारी यांना पुणे येथे केली.

यावेळी उजनी धरण व्यवस्थापन कडून तातडीने अहवाल घेवून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून देण्यात आल्याची माहिती आमदार भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, कालठण सोसायटीचे माजी अध्यक्ष किसनराव जावळे,पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, उजनी धरणग्रस्त शेतकरी दिवाणराव देवकर यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. 

 यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापूर शहरास पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र हे पाणी बंद पाईपलाईनव्दारे देणे गरजेचे आहे. सोलापूर शहरास पिण्यासाठी ४ ते ५ टीएमसी पाणी लागते मात्र हे पाणी भिमा नदीतून सोडण्यात येत असल्याने २५ ते ३० टीएमसी पाणी दिले जाते. त्यामुळे यंदा धरण भरून सुध्दा ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील भिगवण ते हिंगणगाव परिसरातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून त्यामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. भिमा नदी पात्रात खोलवर चा-या घेवून या पाणी पुरवठा योजना कश्या- बश्या सुरू आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी, पशूधनास पाणी व चारा कमी पडत असून या परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. धरणात दि. २७ मे रोजी उणे ५२. ६२ टक्के पाणीसाठा असून धरणातील पाणी पातळी ४८५. ९२० मीटर झाली आहे. धरणात उणे २८.१९ टीएमसी पाणी साठा आहे मात्र धरणात १५ ते २० टीएमसी गाळ असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उजनीचे पाणी तातडीने बंद करावे. उजनी धरणातील पाणी नियोजनासंदर्भात इंदापूर तालुक्यावर अन्याय होवू नये म्हणून विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे सुतोवाच आमदार भरणे यांनी केला.

महारूद्र पाटील म्हणाले, उजनी धरणासाठी सर्वाधिक त्याग इंदापूर तालुक्याने केला. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात धरण उशाशी मात्र कोरड घश्याशी अशी स्थिती निर्माण होवून पाणी कमी पडते. यंदा उजनी धरण संपुर्ण क्षमतेने भरल्यानंतर सुध्दा पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उभी पिके जळू लागल्यामुळे पशूधनास चारा कमी पडत आहे. नदीत चा-या काढून पाणी घेण्यासाठी धडपड करणा-या पळसदेव येथील शेतकरी नारायण लावंड याचा वीजेचा शॉक बसून दुर्देवी मृत्यू झाला. दुष्काळी परिस्थितीत शासनाने धरणातील पाण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी २४ तासात धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इषारा त्यांनी दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com