भिगवण : मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आंदोलने करुन आरक्षणाची मागणी केली होती. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे व नाकर्तेपणामुळे मराठा समाजामध्ये अंसंतोषाचे वातावरण आहे. मराठा समाज आजही कायदेशीर मार्गानेच आंदोलन करीत आहे. परंतु आंदोलनामध्ये बाह्य प्रवृत्ती घुसवून हे आंदोलन हिंसक व बदनाम करण्याचा प्रयत्न होत आरोप 'पीपल्स रिपब्लिकन पार्टी'चे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केला.
येथील शासकिय विश्रामगृहामध्ये शुक्रवारी (ता.03) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष संजय सोनावणे उपस्थित होते.
कवाडे पुढे म्हणाले, सध्या मराठा समाजातील तरुण आरक्षणासाठी प्राण त्यागाचा मार्ग अवलंबित आहेत. तरुणांनी प्राणत्यागाचा मार्ग सोडून हक्कासाठी शांततेचा मार्ग अवलंबिला पाहिजे.
अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाबाबत कवाडे पुढे म्हणाले, कायदा कमकुवत झाल्यामुळे दलित व आदिवासींवरील अन्यायांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा मूळ स्वरुपात ठेवावा, यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व समविचारी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठविला होता. अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे दलित व आदिवासींमधील उद्रेकाची जाणीव केंद्र शासनाला झाल्यामुळे संसदेत विधेयक मांडून परिस्थिती पूर्ववत ठेवण्यासाठी विधेयक मांडले आहे.
केंद्राने हा निर्णय लोकांचे हित लक्षात घेऊन नव्हे तर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतला असल्याचा आरोप करत हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.