वर्षाच्या अखेरीस उपलब्ध रकमेचे 'रेशनिंग'च

वर्षाच्या अखेरीस उपलब्ध रकमेचे "रेशनिंग'च
वर्षाच्या अखेरीस उपलब्ध रकमेचे "रेशनिंग'च

पुणे - अडीच हजारांची मर्यादा असतानाही एटीएममधून दोन हजार रुपयेच मिळत होते. अनेकदा एटीएम बंद होती. एक जानेवारीपासून साडेचार हजार रुपये काढता येत असतील, तर बॅंकांनी एटीएममध्ये पुरेशी रोकड भरायला हवी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मागणीच्या तुलनेत बॅंकांना एक तृतीयांश अर्थपुरवठा होत असून, पन्नास दिवस उलटल्यानंतरही वर्षाच्या अखेरच्या दिवशी बॅंकांकडून उपलब्ध रक्कम रेशनिंगद्वारे नागरिकांना द्यावी लागत होती.

नागरिकांच्या सोयीसाठी बॅंकांकडून उपलब्ध रकमेपैकी 70 टक्के रकमेचा भरणा एटीएम केंद्रांवर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही बॅंकांच्या एटीएममधून शनिवारी पुरेशी रोकड मिळत होती; परंतु काही बॅंकांच्या एटीएममधून दोन हजार रुपयेच मिळत होते. काही बॅंकांची एटीएममधील रोकड संपल्याने ती बंद होती. पन्नास दिवसांच्या तुलनेत बॅंका आणि एटीएम केंद्रांवरील नागरिकांची गर्दी ओसरत असली, तरीही कॅशलेसचा पर्याय अद्यापही अनेकांच्या अंगवळणी पडलेला नाही. गरजेपेक्षा अपुरी रक्कम हाती येत असल्याने काटकसरीत महिन्याचे नियोजन करावे लागत असून, काही नागरिकांच्या मते दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची आवश्‍यकता नसल्याने फारशा अडचणी आल्या नाहीत.

दरम्यान, रविवार (ता. 1) पासून 10 तारखेपर्यंत बॅंकांमध्ये पगारदार व निवृत्तिवेतनधारकांच्या रांगा लागण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरमध्ये पगारदार आणि निवृत्तिवेतनधारकांनी आपल्याच खात्यातून अपुरे पैसे घ्यावे लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. "एटीएम'मधूनही साडेचार हजार रुपये मिळतील का? हेदेखील पाहावे लागेल. त्यावरच केंद्र सरकारच्या घोषणेचे यशापयश अवलंबून असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.

माझे निवृत्तिवेतन राष्ट्रीयीकृत बॅंकेत जमा होते; परंतु मी कधीही ते एकरकमी काढले नाही. गरजेनुसारच ते काढत होतो. त्यामुळे आर्थिक अडचण जाणवली नाही; पण रोकड कमी असून, आहे त्या गंगाजळीत नागरिकांची सोय करण्यासाठी तुलनेने मागील महिन्यात काही बॅंकांकडून कमी अर्थपुरवठा होत होता. परिणामी माझ्या मित्रांना मिळालेल्या रकमेवरच समाधान मानावे लागत होते.
- सुधाकर चिमलगीकर, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी

पगार जमा होऊनही मला डिसेंबरमध्ये चार हजार रुपयेच मिळाले. त्यामुळे अडचण आली. "जशी रोकड उपलब्ध होईल, तसे पैसे देऊ', अशी उत्तरे बॅंकेकडून मिळत होती. धनादेशाद्वारे व्यवहार करण्यावरही मर्यादा येतात. दैनंदिन व्यवहारांसाठी काही प्रमाणात तरी रोकड लागतेच. साडेचार हजार रुपये देणार असतील, तर एटीएममध्ये योग्य पद्धतीने भरणा होणे आवश्‍यक आहे.
- मदन गिजरे, ड्राफ्समन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com