
HTMS System : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ‘एचटीएमएस’ यंत्रणा; वाहनांच्या अपघातांवर येणार नियंत्रण
पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचे काम सुरू असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते पूर्ण होणार आहे. त्याचबरोबरच वाहनांसाठी विशेष थांबा उभारण्याची संकल्पना आयआरबी कंपनीकडून मांडली असून त्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळताच महामार्गावर ते उभारण्याचे नियोजन आहे.
वाढत्या वेगामुळे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘आयटीएमएस प्रणाली’ कार्यान्वित करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक चार किलोमीटर अंतरावर ‘गती शोध प्रणाली, ‘लेन शिस्त उल्लंघन शोध प्रणाली’ आदी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या विशेष यंत्रांच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. महामार्गावरील संवेदनशील अशा ९४ किलोमीटर पट्ट्यात ही प्रणाली कार्यान्वित करणार असून सद्यःस्थितीला ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील.
सूचना प्राप्त होताच कार्यवाही
या महामार्गावर निसर्गरम्य ठिकाणे आहेत. त्यामुळे प्रवासी रस्त्याच्याकडेला वाहने थांबवितात. तसेच उपाहारगृह किंवा इतर ठिकाणी वाहने थांबत असल्याने वर्दळीच्या या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यावर उपाय म्हणून ‘आरआबी कंपनी’ कडून महामार्गालगत ठराविक अंतरांवर वाहन थांबे करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यांच्याकडून सूचना प्राप्त होताच याबाबतची कार्यवाही करणार आहे.
सद्यःस्थितीला वाहतूक पोलिसांकडून तसेच महामार्गाच्या अधिकारी, कर्मचारी बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. विशेषतः महामार्गालगत असणारे निसर्गरम्य ठिकाणे, घाट रस्त्यात वाहने थांबविले जात आहेत, अशा वाहनधारकांवर देखील कारवाई केली जात आहे. पायाभूत प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीकडून वाहन थांब्यांबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून याबाबत मान्यता प्राप्त होताच पुढील कार्यवाही सुरू करणार आहे.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी