पुणे - उजवा मुठा कालवाफुटी दुर्घटनेत पूर्णतः बाधित झालेल्या 98 कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) त्याच परिसरात ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याबाबतचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
त्यासाठी पात्र आणि अपात्रची यादी तपासणे, याच परिसरात एसआरएच्या ताब्यात असलेल्या, तसेच येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात ताब्यात येणाऱ्या सदनिकांची माहिती सादर करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्यात आले.
कालवाफुटीनंतर दांडेकर पूल आणि परिसरात बाधित झालेल्या परिसरात पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचा आढावा आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, एसआरएचे सुरेश जाधव, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक धीरज घाटे, महेश लडकत, रघू गौडा, शंकर पवार यांच्यासह अधिकारी आणि महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर बापट म्हणाले, 'पूर्णतः बाधित झालेल्या कुटुंबांचे एसआरएच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात येणार आहे. राजेंद्रनगर परिसरात सुमारे 25 सदनिका आहेत. त्या ठिकाणी पहिल्या टप्यात काहींचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या परिसरात अन्य काही एसआरएच्या योजना सुरू आहेत. त्यातून किती सदनिका उपलब्ध होणार आहेत. यांची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुनर्वसन करताना पात्र- अपात्रांची यादी तयार करण्याच्या सूचना एसआरएच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, तर अंशतः बाधित असलेल्यांना महापालिकेच्या ताब्यात आलेल्या सदनिका भाडेतत्त्वावर देण्याचाही निर्णय झाला आहे.''
दुरुस्तीचे काम आणखी दोन दिवस चालणार
भगदाड पडलेल्या ठिकाणी सीमाभिंतीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आणखी पाच ते सहा ठिकाणी कालवा धोकादायक झाला आहे. सध्या बंद असल्यामुळे त्या ठिकाणची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला दिल्या आहेत. लष्कर भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या 60 ते 80 क्युसेकने पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. दुरुस्तीचे काम अजून दोन दिवस चालेल, त्यानंतर पूर्ण क्षमतेने कालव्यात पाणी सोडण्यात येईल, असेही बापट यांनी सांगितले.
|