चंद्रकांतने जात-धर्माचा विचार कधीच केला नाही - नाना पाटेकर

चंद्रकांतने जात-धर्माचा विचार कधीच केला नाही - नाना पाटेकर

पुणे - ""चंद्रकांतला सरकारी नोकरीत अनेकांनी आमिषं दिली असतील, तरीही आडमुठ्या लोकांना तोंड देत, शासकीय सेवेत त्याने चांगले कार्य केले. दळवीने कधीच जात-धर्माचा विचार केला नाही. नोकरीतही तो गावकऱ्यांची दुःखे समजून घेत राहिला,'' अभिनेते नाना पाटेकर बोलत होते आणि बहुसंख्य श्रोते त्यांचे शब्द एकाग्रचित्ताने ऐकत होते. अचानकच नानांनी भाषण आटोपतं घेतलं आणि वाकून नमस्कार करून माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना कडकडून मिठी मारली. श्रोत्यांनीही उभे राहून दळवी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता गौरव सोहळ्यात पाटेकर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते दळवी यांचा सत्कार करण्यात आला. वात्रटीकाकार रामदास फुटाणे, माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड, शेखर गायकवाड, सहनिबंधक (कोकण विभाग) ज्योती लाटकर, दळवी यांच्या पत्नी प्रभा, रामदास माने, आनंद कोठाडिया, विलास शिंदे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड, कृषी व पणन संचालक सुनील पवार, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, संजय आवटे, पराग करंदीकर, सचिन इटकर, धर्मेंद्र प्रधान, रामदास माने उपस्थित होते. 

नाना म्हणाले, ""चंद्रकांतकडे माझे कधीच वैयक्तिक काम नव्हते. पण, त्याने अनेक कामे केली. आम्हा कलावंतांना सुख-दुःखाच्या व्याख्यांमध्ये जगावे लागते. दळवीने त्याच्या वाटणीला आलेले "ऊन' सहन केले, पण दुसऱ्याला नेहमी "सावली' देत राहिला. शासकीय सेवेत राहून त्याने निढळ (ता. खटाव, जि. सातारा) या त्याच्या गावासाठी कार्य केले. त्याचा सन्मान करण्याएवढी आमची ताकद नाही. चंद्रकांत तू निवृत्त झालेला नाहीस. असंच काम करीत राहा. तुला काय हवंय ते माग. देण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या कार्याला माझा नमस्कार.'' 

डॉ. करमळकर म्हणाले, ""काही माणसे त्यांच्या उत्तुंग कार्यातून नाव कमावतात. दळवी यांचे कार्यही असेच आहे. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याकरिता दळवी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची विद्यापीठाला गरज आहे.'' 

निवृत्तीनंतर चांगले बोलावे लागते, असे म्हणतात. पण काही मंडळींबद्दल नाइलाजाने मला चांगले बोलावे लागले आहे. मी बोललो, पण घरी गेल्यावर अंघोळही केली. प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या राजकारणी व्यक्तीबद्दल राग असतो. गोळी घालावीशी वाटेल, असा कोणीतरी राजकारणी प्रत्येकाच्या मनात असतो; पण राजकारणातही अनेक माणसे चांगली आहेत. पक्षापेक्षा माणसाचे कार्य पाहून त्याला निवडून द्या, असा सल्लाही नाना पाटेकर यांनी या प्रसंगी उपस्थितांना दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com