' गट- तट बाजूला ठेवून पक्ष हिताचे काम करा'

narayan-rane-pune
narayan-rane-pune

पुणे -  ""पुणे महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आपापसांतील गट- तट बाजूला ठेवून एकत्र या, अशा कानपिचक्‍या घेत नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता पक्ष हिताचे काम करावे,'' असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे दिला.

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह'चे उद्‌घाटन राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार मोहन जोशी यांनी याचे आयोजन केले होते. आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, उपमहापौर मुकारी अलगुडे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी आणि नगरसेवक आबा बागूल व्यासपीठावर उपस्थित होते.

""पुणे कॉंग्रेसचे होते; काय असं उणं झालं, की त्यामुळे कॉंग्रेसला उणं व्हावं लागलं', असा थेट सवाल करत राणे यांनी "आपण कशात कमी पडलो म्हणून आपला एकही आमदार निवडून आला नाही. याचे आत्मपरीक्षण करा,'' असे आवाहन केले. तसेच "परिवर्तन हे एका रात्रीत होणार नाही', याची जाणीव करून देत शहर कॉंग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाला राणे यांनी लक्ष्य केले.

ते म्हणाले, ""महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत नेत्यांनी एकत्र फिरून आमची एकजूट झाली, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोचवा. त्यातून कार्यकर्तेही एकत्र येतील. नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता, फक्त पक्षाच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करा. तेच पक्षाच्या हिताचे आहे.''

नेत्यांची एकजूट महत्त्वाची
""पक्ष अडचणीत असतो, त्या वेळी नेत्यांमधील एकजूट महत्त्वाची असते. एकमेकांना कमी लेखणे, एकमेकांचे पाय ओढणे हे बंद करा. सत्तेत असताना ओढले तर चालतील, पण विरोधात असताना एकत्र राहायचे. सत्तेत आणि विरोधात असताना काय करावे, हे कळले पाहिजे,'' असा सल्लाही त्यांनी व्यासपीठाकडे बघून दिला.

जनतेमध्ये विश्‍वास निर्माण करा
राणे म्हणाले, ""हा देश, राज्य आणि पुणे सांभाळण्याची क्षमता फक्‍त कॉंग्रेसमध्येच आहे, असा विश्‍वास जनतेमध्ये निर्माण करा. उमेदवारीकडे लक्ष ठेवू नका. पक्षाध्यक्षांनी देशासाठी योगदान दिले, मग पुण्याच्या लोकांसाठी योगदान देण्यात तुम्ही मागे का, हा माझा प्रश्‍न फक्त कार्यकर्त्यांनाच नाही, तर नेत्यांनाही आहे.''

आमदार "माजी' झाले!
""माझी माणसे "आजी' असावे असे वाटते,'' या वाक्‍यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तोच सूर धरून राणे म्हणाले, ""या टाळ्यातून यांना आजी होण्याचे वातावरण पुण्यात तयार करा.

भाजपने पुण्यासाठी काय केले?
शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, उद्याने, क्रीडांगण यापैकी कॉंग्रेसने काय कमी केले, असे विचारत राणे यांनी भाजपवर तोफ डागली. ""भाजपने पुण्यासाठी काय केले? त्यांनी फक्‍त थापा मारल्या असून, शब्द फिरवण्यामध्येच ते हुशार आहेत,'' असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com