विचारस्वातंत्र्यावर झुंडशाहीची गदा - नरेंद्र चपळगावकर

नवी पेठ, एस.एम.जोशी फाउंडेशन - ‘श्री. ग. माजगावकर स्मृती सन्मान’ माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना प्रदान करताना ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ.
नवी पेठ, एस.एम.जोशी फाउंडेशन - ‘श्री. ग. माजगावकर स्मृती सन्मान’ माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना प्रदान करताना ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ.

पुणे - ‘आज विचार स्वातंत्र्यावर सरकार व त्याचबरोबर झुंडशाही नियंत्रण आणू पाहते आहे. विचार स्वातंत्र्याबद्दल सांगावे लागते, आठवावे लागते, याचे कारण जागतिक परिस्थितीत दडले आहे,’’अशी टीका विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. 

चपळगावकर यांना प्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मानाने गौरविण्यात आले. श्री. ग. माजगावकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे पहिले मानकरी चपळगावकर ठरले. रोख ४० हजार, शाल, ज्ञानदीप व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

‘स्वातंत्र्य : लेखकांचे आणि वाचकांचे’ यावर बोलताना चपळगावकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीत सुमारे एक हजार वर्षांचा उदारमतवादाचा काळ होऊन गेला. उपनिषदांच्या रचना करणाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध मते मांडली. मात्र संस्कृतीतील या गोष्टी नकोत, असे काहींना वाटते. विचारस्वातंत्र्याची पर्वा नाही, हा नवा ट्रेंड सध्या रुजणे भीतिदायक आहे. झुंडशाहीचा विरोध लेखकाला एकट्याला करावा लागतो. संस्था त्याच्या पाठीशी उभ्या रहात नाहीत. वाचकाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी स्वायत्तता जपणारी वाचनालये हवीत. सरकारी अनुदानातून पुस्तके खरेदी करताना, त्यांची निवड कशी करावी, याबद्दलच्या सूचना सरकारी समित्यांवरील ज्या सभासदांकडून येतात, त्यांना साहित्याची जाण असतेच असे नाही. उत्तम पगार असणारे लोकही पुस्तके खरेदी करत नाहीत, याचा खेद वाटतो.’

डॉ. रसाळ म्हणाले, ‘लोकहितवादी, लोकमान्य टिळक, आगरकर अशा समाजसुधारकांची वैचारिक परंपरा वृत्तपत्रे आज विसरली आहेत. वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे सध्याचे स्वरूप बघता, गुलामगिरीची नवी परंपरा निर्माण होते की काय, असे वाटते. अशा परिस्थितीत निर्भीडपणे लिहिणाऱ्या विचारवंतांची गरज आहे.’ या वेळी राजहंसचे संचालक दिलीप माजगावकर उपस्थित होते. डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. राजहंस प्रकाशनचे प्रमुख संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी पुरस्कारामागची भूमिका मांडली. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com