सुशिक्षित अन्‌ प्रश्‍नांची जाण असणारे उमेदवार- राष्ट्रवादी

Vandana Chavan
Vandana Chavan

महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आपापल्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांना नमविण्याची रणनीती, संभाव्य अर्थात, तगड्या उमेदवारांची चाचपणी आणि पक्षातर्गंत वादाचे आव्हान मोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या पक्षाच्या शहराध्यक्ष ऍड. वंदना चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद.
 

प्रश्‍न : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आव्हान असताना महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची काय रणनीती असेल? त्यादृष्टीने काय मोर्चेबांधणी आहे?
उत्तर : निवडणुकीत भाजपचे आव्हान असेल. मात्र गेल्या दहा वर्षांत शहरात उभारलेले प्रकल्प ही जमेची बाजू असेल. भविष्यातील प्रकल्प हीही महत्त्वाची बाब ठरेल. दुसरीकडे, प्रत्येक प्रभागात सुशिक्षित म्हणजे, शहरातील प्रश्‍नांची जाण असलेले उमेदवार निवडणुकीत असतील.''

प्रश्‍न : या निवडणुकीच्या प्रचारात काय मुद्दे असतील, की जेणेकरून पुन्हा आपल्या पक्षाला सत्ता मिळेल. असे वाटते?
उत्तर : प्रचारात केवळ राजकीय उद्देशाने आरोप-प्रत्यारोपांपेक्षा जागतिक पातळीवरील शहरांच्या तुलनेत नव्याने काही प्रकल्प उभारण्यात येतील, याची मांडणी मतदारांपुढे केली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोचवून नेमकी वस्तुस्थिती मांडू. गेल्या निवडणुकीतील जाहीरनामा हा महत्त्वाचा घटक असेल. ज्यामुळे मतदारांचा विश्‍वास संपादन करता येणार आहे. भविष्यातील शहराची नेमकी वाटचाल काय, तिचे परिणाम याबाबतचे चित्र उभे केले जाईल. ते पूर्ण करण्याचा कालावधीही लोकांपुढे मांडू.

प्रश्‍न : बदलत्या राजकीय स्थितीत, उमेदवारी देताना काही निकष ठरविले आहेत का? निवडणुकीत तरुण उमेदवारांचे प्रमाण किती असेल?
उत्तर : निवडणुकीतील उमेदवार हा सुशिक्षित असेल आणि तो लोकांशी जोडलेला असावा, ज्यामुळे निवडून येण्याची क्षमता त्यांच्यात राहील, हा निकष उमेदवारीसाठी आहे. बहुसदस्यीय प्रभागरचनेत चार उमेदवार असल्याने तरुणांना प्राधान्य असेल. मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर तरुण उमेदवारांचे प्रमाण निश्‍चित होईल.

प्रश्‍न : गेल्या काही वर्षांत पक्षात गटतट असल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ते उघडपणे दिसत आहेत. या वादाचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्‍यता असेल. तो कसा टाळला जाईल.
उत्तर : पक्षात नेहमीच लोकशाही पद्धतीने कामकाज होते. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाला फार काही महत्त्व दिले जात नाही. ज्या पद्धतीने पक्षात गटतट असल्याचे चर्चा रंगविण्यात येते, तशी वस्तुस्थिती नाही. त्यामळे निवडणुकीत कोणताही फटका बसणार नाही.
प्रश्‍न : पक्षाच्या जाहीरनामा कोणत्या बाबींचा समावेश असेल, तो कधी प्रसिद्ध केला जाईल?
उत्तर : या निवडणुकीत पारंपरिक पद्धतीने जाहीरनाम्यात मुद्दे राहणार नाहीत. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेल्या जगातील अन्य शहरांमधील समस्या, त्यावरील उपाय यांचा बाबींचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला नेमकी दिशा मिळणार आहे. विशेष म्हणजे, जाहीरनाम्याची पूर्णपणे अंमलबजावणी होईल. जाहीरनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. तो लवकरच जाहीर करू.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com