महासत्तेसाठी सर्वांच्या एकीची गरज - वेंकय्या नायडू

महासत्तेसाठी सर्वांच्या एकीची गरज - वेंकय्या नायडू

पुणे - ‘‘कृषी आणि सहकार क्षेत्रासमोरील आव्हानांचा सर्वांनी एकत्रित येऊन मुकाबला केल्यास भारताला जगातील दुसरी महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू शकणार नाही,’’ असा विश्‍वास उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी व्यक्‍त केला.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या (व्हॅम्निकॉम) कृषी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविकाधारक (एमबीए) विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ सोमवारी पार पडला, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. विद्यासागर राव होते. केंद्रीय कृषी व सहकार विभागाचे सचिव संजय अग्रवाल, अतिरिक्त सचिव वसुधा मिश्रा, ‘व्हॅम्निकॉम’चे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी उपस्थित होते.

नायडू म्हणाले, ‘‘कृषी व्यवसाय आणि सहकार क्षेत्रासमोर मोठी आव्हाने असून, त्याचा मुकाबला करण्याची क्षमता आपल्यात आहे. जागतिक पातळीवर आर्थिक व्यवस्था खालावत चालली आहे. चीनचा आर्थिक विकास दर ६.८ टक्‍के आहे, तर भारताचा आर्थिक विकास दर ७.४ टक्‍के असून तो वाढतच आहे.’’ सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ग्रामीण भारताच्या विकासात पायाभूत 

सुविधांचा विकास हा महत्त्वाचा घटक आहे. कृषिपूरक प्रक्रिया उद्योगांसोबतच, तांत्रिक कौशल्ये, ग्रामीण रस्त्याची कनेक्‍टिव्हिटी सुधारणे, गोदाम, कोल्ड स्टोरेज सुविधा, पाणी आणि वीजपुरवठा या काही महत्त्वाच्या उपाययोजना आहेत. भविष्यात कृषी क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी ‘व्हॅम्निकॉम’ संस्थेचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

नायडू यांच्या हस्ते प्रारंभी ‘व्हॅम्निकॉम’च्या कृषी व्यवस्थापन क्षेत्रातील २०१७ ते १९ या बॅचच्या ५१ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यापैकी तीन सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी मंजूनाथ याला सुवर्ण, संतूर आरट याला रौप्य आणि सुकुमार एस. याला ब्राँझ पदकाने सन्मानित केले. 

वेंकय्या नायडू म्हणाले...
  शेतीसोबत पूरक व्यवसाय केल्यास शेती फायदेशीर 
  कृषी बाजारपेठेतील मध्यस्थांना काढून बाजारांची पुनर्रचना करावी
  विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीत जाऊन मते जाणून घ्यावीत
  कर्जमाफी, मोफत वीजपुरवठा हे लोकप्रिय उपाय दीर्घकाळ टिकणारे नाहीत
  शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज आणि व्याजदर कमी करणे आवश्‍यक 
  पीक विमा योजना आकर्षक आणि प्रभावीपणे अमलात आणली पाहिजे

मराठीतून भाषणाला सुरवात
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी जोशपूर्ण भाषणाने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. ‘या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मला आनंद होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन, तसेच पालक आणि शिक्षकांना माझ्या शुभेच्छा’, या सुरवातीच्या मराठी भाषेतील शब्दांवर विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com